मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी पुन्हा उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकरांची काहिली झाली. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत होती. दुपारच्या सुमारास वातावरणात उष्णतेसह आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याने उकाड्यात भर पडली.

गेले काही दिवस मुंबईत पाऊस पडत होता. त्यामुळे तापमान दिलासा मिळाला. तसेच उकाड्यापासूनही काहीसा दिलासा मिळाला होता. पावसाने दडी मारताच मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईकर सोमवारी घामाच्या धारांनी हैराण झाले होते. मागील काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मध्येच ढगाळ वातावरण, तर मध्येच उन्हाचा ताप. यामुळे मुंबईत पुन्हा उकाडा वाढला आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, सोमवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी तापमानात ५ अंशानी वाढ झाली होती. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस पडतो तेव्हा पश्चिमेकडून वेगवान वारे वाहतात. त्यामुळे वातावरणात गारवा येतो. मात्र, सध्या वाऱ्याचा वेग मंदावला आहे. परिणामी, उष्ण व दमट वातावरणामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे.

आर्द्रतेचे प्रमाण अधिक

समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा लागत आहेत. घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मुंबईकर करीत आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.