मुंबई : मुंबईत बेकायदेशीर शर्यतीसाठी घोड्यांचा वापर करण्यात आल्याची तक्रार पेटा इंडियानी केली होती. या तक्रारीवरून विक्रोळी येथील ५० व्या न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (जेएमएफसी) न्यायालयाने पूर्व द्रुतगती महामार्गावर बेकायदेशीर घोडागाडी शर्यतीत वापरण्यात आलेल्या बारा घोड्यांची सुटका केली.

पूर्व द्रुतगती महामार्गावर काही दिवसांपूर्वी पहाटे ३ ते ४ दरम्यान ताब्यात घेतलेल्या घोड्यांची शर्यत लावण्यात आली होती. ही शर्यत घाटकोपर पूर्वपासून सुरु करण्यात आली होती. जी पुढे विक्रोळीच्या दिशेने गेली असल्याचे तपासादरम्यान समोर आले. या शर्यतीची ध्वनिचित्रफित देखील समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आली होती. या ध्वनिचित्रफितीत ६ ते ८ घोडागाडी आणि त्यासोबत अनेक दुचाकीस्वार असल्याचे दिसले.

हेही वाचा : विमानाचे उड्डाण रोखण्यासाठी दूरध्वनीवरून खोटी माहिती देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

पेटा इंडियाच्या तक्रारीनंतर, पंत नगर पोलिस ठाण्याने भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १२५, २८१ आणि २९१ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा (पीसीए) १९६० च्या कलम ११ (१) अंतर्गत अज्ञात आयोजक, घोडागाडी चालक आणि सहभागी असलेल्या इतरांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला. यानंतर महामार्गावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या घोड्यांची ओळख पटविण्यात आली. यानंतर पेटा इंडियाच्या मदतीने सर्व बारा घोडे जप्त करण्यात आले. १९६० अंतर्गत अधिसूचित केलेल्या प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक नियम, २०१७ चे पालन करून, जप्त केलेल्या घोड्यांचा अंतरिम ताबा महाराष्ट्रातील एका अभयारण्यात देण्यात आला.

हेही वाचा : झोपु प्राधिकरणाच्या घरभाडे व्यवस्थापन प्रणालीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव, प्रणालीस ‘स्कॉच सुवर्ण गौरव’ पुरस्कार प्राप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान , ‘मुंबईत परवाना नसलेल्या तबेल्यांमध्ये घोडे ठेवण्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मुंबई पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाला विनंती आहे’, असे पेटा इंडिया क्रूएल्टी रिस्पॉन्स कायदेशीर सल्लागार आणि सहयोगी संचालक मीत अशर यांनी सांगितले. तसेच परफॉर्मिंग ॲनिमल्स (नोंदणी) नियम, २००१ अंतर्गत, भारतीय प्राणी कल्याण मंडळमध्ये नोंदणी केल्याशिवाय प्रशिक्षण, प्रदर्शन किंवा कामगिरीसाठी कोणताही प्राणी कायदेशीररित्या वापरला जाऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.