मुंबई : देवनार कचराभूमीमधील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून नवयुग इंजिनीअरिंग कंपनीला कंत्राट देण्याचे निश्चित झाले आहे. या कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवण्यासाठी सुमारे २३६८ कोटी रुपये खर्च अंदाजित होता. नवयुग कंपनीने ७ टक्के अधिक दराने बोली लावली असून कामाचा खर्च आता २,५४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये प्रति टन कचऱ्यावर आता १,३७३ रुपये इतका प्रक्रिया खर्च होणार आहे.

देवनार कचराभूमीमधील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ तीन कंपन्यांनी या कामासाठी निविदा भरल्या होत्या. त्यात नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लि. आणि आरई सस्टेनेबिलिटी आणि एच. जी. इन्फ्रा इंजिनीअरींग लि. या तीन कंपन्यांचा समावेश होता. त्यापैकी नवयुग या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याकरीता या जागेवरील अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले. त्यानंतर हा जुना कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने मे महिन्यात निविदा मागवल्या होत्या. निविदा भरण्यापूर्वीची पूर्व बोली बैठक मे महिन्याच्या अखेरीस पालिका मुख्यालयात पार पडली होती. त्यावेळी या बैठकीला २१ विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, प्रत्यक्षात शेवटच्या दिवसापर्यंत यापैकी केवळ ३ निविदाकारांनी निविदा भरल्या. या निविदाकारांचे आर्थिक देकार उघडण्यात आले असून त्यातून नवयुग कंपनीची निवड करण्यात आली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी झाला आहे. मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून जुना कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली असून महसूल व वन विभागाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही जमीन रिकामी करण्याची विनंती फेब्रुवारी महिन्यात केली होती.

अदानी कंपनीसोबत संयुक्त भागीदारीचा इतिहास

निविदा भरलेल्या तीन कंपन्यांपैकी आरई सस्टेनेबिलिटी कंपनी आधीच देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारत आहे. तर अन्य दोन कंपन्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील आहेत. नवयुग कंपनीने अदानी कंपनीसोबत संयुक्त भागिदारीत विजयवाडा बायपास प्रकल्प राबवला आहे. तर एच. जी. इन्फ्रा कंपनीनेही अदानी कंपनीसोबत संयुक्त भागिदारीत उत्तर प्रदेशमधील गंगा एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी काम केले आहे. त्यात नवयुग कंपनीचा आर्थिक देकार सर्वात कमी होता. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. नवयुग कंपनीही १९८६ मध्ये स्थापन झालेली आहे. कंपनीत १५ हजार कामगार असून साडे नऊ हजार कोटींची उलाढाल आहे.

१८५ लाख मेट्रीक टन कचरा

देवनार कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवावा लागणार आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत.

असा असेल कामाचा व्याप

एकूण जुन्या कचऱ्याचे अंदाजित वजन – १८५ लाख मेट्रीक टन

एकूण व्याप्त जागा – ११० हेक्टर

कंत्राट कालावधी – तीन वर्षे (पावसाळासहित)

दरदिवशी कचऱ्याची विल्हेवाट – २३ हजार मेट्रीक टन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर दिवशी वाहनांची ये – जा – प्रतिदिन १२००