मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये अथवा त्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार अथवा अनियमितता झालेली नाही. प्रशासक राजवटीत मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामकाज नियमानुसार व सर्व प्रक्रियांचे पालन करूनच करण्यात येत असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता आरोपांबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले.

गेल्या दहा महिन्यांपासून मुंबई महापालिकेच्या विविध कामांमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकरणांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. ठाकरे यांनी बुधवारी आपल्या पक्षातील आमदार व खासदारांसह राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. महामगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून इक्बाल सिंह चहल यांचीही चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केली होती. गेल्या नऊ महिन्यांत महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवस्थापन सुरू आहे, कंत्राटदारांची मर्जी राखणारे निर्णय घेतले जात आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : आत्महत्या रोखण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

स्त्यांच्या कामांचा सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा, खडी मक्तेदारीचा घोटाळा, सॅनिटरी पॅड वेेडींग मशीन घोटाळा, तसेच रस्त्यावरील विविध साहित्याच्या खरेदीचा घोटाळा असे अनेक आर्थिक घोटाळे झाले असून या सगळ्याला मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक जबाबदार आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला होता. प्रशासनाच्या कारभारावर अलिकडे जाणीवपूर्वक अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत, असे आयुक्तांनी स्पष्टीकरणात नमुद केले आहे. प्रशासक राजवटीत नियमानुसारच काम सुरू असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा >>> चार महिन्यांनंतरही निकालाची प्रतीक्षा; मुंबई विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल रखडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांची उत्तरे विधिमंडळ, पत्रव्यवहार, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे इत्यादी व्यासपीठांवरून यापूर्वी  देण्यात आली आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनात आर्थिक गैरव्यवहार, अनागोंदी, अनियमितता, कंत्राटदारांची मर्जी याअनुषंगाने करण्यात येणारे सर्व आरोप चुकीचे असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे यांनी विविध विषयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्या आरोपांचे महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी सविस्तर उत्तर देत खंडन केले आहे. सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आयुक्तांनी  आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर सविस्तर स्पष्टीकरण दिल्यामुळे महानगरपालिका वर्तुळात त्याचीच चर्चा रंगली होती.