मुंबई : मुंबईचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी परदेशातील मोठय़ा शहरांप्रमाणे एकच शहर प्रशासन (सिटी गव्हर्नन्स) संकल्पना राबविणे ही काळाजी गरज असल्याचे ठाम प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंगळवारी केले. तसा प्रस्ताव मुंबई पालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असल्याचेही चहल यांनी ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमात सांगितले. ठाण्यात सुरुवात केलेल्या या उपक्रमात आतापर्यंत नवी मुंबई, अंबरनाथ या शहरांचे नियोजन कसे चालते, याचा उलगडा करण्यात आला होता. याच उपक्रमांतर्गत मंगळवारी रवींद्र नाटय़ मंदीर येथे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाचा आणि भविष्यातील योजनांचा आयुक्तांनी संपूर्ण पट मांडला. यावेळी आयुक्तांनी शहर प्रशासन ही नवीन संकल्पना मांडली. हेही वाचा >>> मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; उपोषण करणाऱ्यांना राज्य सरकार कशाच्या आधारे आश्वासन देते? ‘‘मुंबईमध्ये म्हाडा, बीपीटी, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, विमानतळ अशी तब्बल १४ प्राधिकरणे आहेत. त्यामुळे मुंबईत साधा रस्ता तयार करतानाही अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे प्रकल्प रखडतात. मुंबईसाठी एकच प्राधिकरण असेल तर निर्णय घेणे आणि ते अमलात आणणे सोपे होईल. मुंबई हे दीड कोटी लोकसंख्येचे आणि जगभरात सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचे शहर आहे. या शहराचे नियोजन करणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट आहे’’ असे सांगून पालिका आयुक्तांनी महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे काम कसे चालते, भविष्यातील योजना काय आहेत, याचा आढावा घेतला. शहर प्रशासनाचे महत्त्व सांगताना आयुक्त चहल म्हणाले की, ‘‘२०१८ पर्यंत मुंबई महानगरपालिका ही केवळ नागरी सुविधा पुरवत होती. मात्र, त्यानंतर पालिका प्रशासनाने पायाभूत सुविधा देण्यासही सुरुवात केली. गेल्या चार-पाच वर्षांत मुंबई महानगरपालिकेने (पान ८ वर) (पान १ वरून) दीड लाख कोटींच्या विविध विकासकामांसाठी कार्यादेश दिले आहेत. सागरी किनारा मार्ग, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठीचा २८ हजार कोटींचा प्रकल्प असे विविध प्रकल्प मार्गी लागले असून, येत्या चार ते सहा आठवडय़ांत आणखी मोठय़ा विकासकामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत’’. हेही वाचा >>> दोन वर्षांच्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी सहा जण अटकेत या कार्यक्रमात सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेडच्या शिल्पा मुळगावकर यांनी पुषपगुच्छ देऊन आयुक्त चहल यांचे स्वागत केले. वीणा वल्र्डचे सुधीर पाटील यांनी आयुक्तांना भेटवस्तू दिली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला पालिकेचे अधिकारी, ‘लोकसत्ता’चे वाचक आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ऑनलाइन पार्किंगची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने २०२० मध्ये वाहनतळ प्राधिकरण संकल्पना मांडली. या प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील खासगी संकुलांमधील रिक्त वाहनतळांच्या जागांचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार ५० लाख वाहनांसाठी जागांची उपलब्धता असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासाठी एका अॅपची निर्मिती करण्यात येत आहे. या अॅपच्या माध्यमातून ठराविक वेळांमध्ये वाहने उभी करण्याची सोय मुंबईकरांना उपलब्ध होऊ शकेल. मुंबईतील तीन विभाग कार्यालयांच्या हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात येणार आहे, असे चहल यांनी सांगितले.