दररोज सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांचा भार वाहणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून ठाणे आणि मुलुंड स्थानका दरम्यान विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक उभारणे वास्तवदर्शी ठरेल का, याची चाचपणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने उशीरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून या नियोजित स्थानकाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. कोपरी येथील मनोरुग्णालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटवून त्याठिकाणी या विस्तारीत स्थानकाचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. याचठिकाणी मोनो, मेट्रो प्रकल्पांच्या एकत्रित वाहतूक प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. स्वप्नवत वाटत असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकेल का याची चाचपणी सल्लागारामार्फत केली जाणार आहे.

बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडणार
मुंबई : विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या शिक्षक संघटनांनी सरकारच्या निर्णयानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडतील.शिक्षकांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मख्याध्यापक संघ महासंघाने मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर होताच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे महासंघाने हा निर्णय घेतल्याचे महासंघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले. तर शासनाचा निर्णय हिताचा असून त्याचे स्वागत करत असल्याचे महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे अध्यक्ष टी. एम. नाईक यांनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानेही सरकारच्या निर्णयानंतर बहिष्कार तात्पुरते मागे घेतल्याचे जाहीर केले.

यासीन भटकळ राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात
मुंबई : ‘इंडियन मुजाहिदीन’ संस्थापक यासीन भटकळ व त्याचा साथीदार असदउल्ला अख्तर याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने दिल्ली पोलिसांकडून बुधवारी ताब्यात घेतले. या दोघांना गुरुवारी मुंबईच्या मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. १३ जुलै २०११ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबईतील दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या तीन ठिकाणी १३ जुलै २०११ रोजी हे शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवले गेले.याप्रकरणात यापूर्वीच पाच जणांना अटक केली आहे. इंडियन मुजाहिदीनचा सूत्रधार असलेल्या यासीनला गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. जर्मन बॉम्बस्फोटाप्रकरणातही त्याच्याकडून माहिती मिळण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीत बांबू प्रक्रिया प्रकल्पाला मान्यता
मुंबई : आदिवासी विभागातील बांबू उत्पादनाला गती देतानाच त्यावर प्रक्रिया करणारा सहकारी तत्वावरील देशातील पहिलाच प्रकल्प नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.  गडचिरोली येथील आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. १९ कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी १३ कोटी ५७ लाख रूपयांचे अर्थसाहाय्य राज्य सरकार करणार आहे. तर प्रकल्पाचा उर्वरीत खर्च भागभांडवल व कर्जाच्या माध्यमातून संबंधीत संस्थांना करावे लागणार आह़े

लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचचे आंदोलन
मुंबई : गेल्या दहा वर्षांत तब्बल ११८ टीएमसी पाणी म्हणजेच १२ लाख एकर शेतीचे पाणी उद्योगाकडे वळवण्यात आले. ते आता पुन्हा शेतीसाठी मिळवण्यासाठी आणि पिण्याचे पाणी समन्यायी पद्धतीने वाटण्याची मागणी करत ‘लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंच’ने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे सरकारने लक्ष न दिल्यास सर्व मंत्री-आमदारांचे प्रतीकात्मक शर्ट फाडून त्यांचे खरे स्वरूप उघडे केले जाईल, असा इशारा आंदोलकांच्या वतीने डॉ. पाटणकर यांनी दिला.

बांधकामाच्या खड्डय़ात बुडून बालकाचा मृत्यू
पनवेल : पनवेल पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी खोदलेल्या खड्डय़ात बुडून बुधवारी एका चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. अनीश शिंदे असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून तो बाजूच्याच लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीत राहत होता. बराच वेळ तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाण्यावर तरंगलेला त्याचा मृतदेहच सापडला.
या दुर्घटनेस कंत्राटदारच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, त्याच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.