गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला आहे. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज दाखल करून सिंग व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

जगताप म्हणाले, “आमच्याकडे आधीच आरोपींविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट आहेत, त्यामुळे आम्ही आरोपीला घोषित गुन्हेगार घोषित करण्यासाठी हा अर्ज करत आहोत.” दरम्यान, या अर्जावर न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी त्याच दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर सिंग आणि इतर दोन जणांविरुद्ध दुसरे अटक वॉरंट जारी केले होते.

जगताप यांनी दाखल केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, “अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आरोपी अद्याप समोर आलेले नाही आणि ते बेपत्ता आहेत, जसे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना गुन्हेगार घोषित केले जावे.” तिघांसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर, वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार्‍यांना सांगण्यात आले. मात्र, अधिकारी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर शोधू शकले नाहीत. तसेच या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाल्याच्या दिवसापासून आरोपी कुठे आहेत, हे माहित नसल्याचं समोर आलंय.