मुंबई : हुंडाबंदी कायद्याला पन्नासहून अधिक वर्षे झाली तरी अद्याप या कुप्रथेच उच्चाटन झालेले नाही. पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याच्या प्रथेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागतिक शहर म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतही विवाहितांभोवती हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळाच्या घटना सर्रास घडत असल्याचे दिसते आहे. गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांनी असे ६०० हून अधिक गुन्हे मुंबईत दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यासाठी एका महिलेची हत्या, तर ९ महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या त्रासाला कंटाळून १६ महिलांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षीपासून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत मुंबईत महिलांसंबधीत आठ हजार ७३६ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी ९१ टक्के म्हणजे सात हजार ९९२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. पण बाहेरच्या अनेक आव्हानांना तोंड देत स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी झटणाऱ्या आधुनिक महिलांपैकी काहींना त्यांच्या स्वतः घरातूनही मानसिक व शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या १६ महिन्यांत मुंबईत हुंड्याशी संबंधीत ६२७ गुन्हे घडले आहेत. त्यात ६०१ प्रकरणांमध्ये महिलांना हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक त्रास देण्याच्या घटनांचा समावेश आहे. एका महिलेची तर हुंड्यासाठी कुटुंबियांनी हत्या केली आहे. एकूण २५ महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १६ जणींनी मानसिक व शारिरीक त्रास सहन न झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले. लग्नानंतर काहीच वर्षांनंतर ९ जणींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हे दाखल केले आहेत. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे संवेदनशीलतेने हाताळताना पोलिसांनी ९१ टक्के गुन्ह्यांची उकल केली आहे. त्याशिवाय असे गुन्हे घडण्यापूर्वीच सामोपचाराच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांकडून समुपदेशनाद्वारे सामोपचाराचा प्रयत्न
घराच्या चार भिंतीतील कौटुंबिक वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर समुपदेशन अथवा इतर मार्गांनी दाम्पत्यामध्ये समेट करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करतात. त्यावेळी सुरूवातीलाच कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिलांना तात्काळ मदत पुरवण्याच्या दृष्टीने पोलीस ठाण्यात महिला कक्ष व विशेष मदतवाहिनीही देण्यात आली आहे. या महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत सामोपचार घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे. महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या माध्यमातून महिलांविरोधात घडलेल्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यात येतो. या विभागात कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय्य कक्ष यांचा समावेश होतो. कक्ष २ हा हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्धवणारे इतर गुन्हे, भारतीय न्याय संहिता कलम ८५ अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास तसेच सदरबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा करण्याचे काम करतात.