मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील फलाट क्रमांक १ ते १८ पादचारी पुलाने जोडले जाणार असून पादचारी पुलाच्या कामास सुरुवात झाली आहे. या पादचारी पुलामुळे आता प्रवाशांना हार्बर मार्गाचे फलाट क्रमांक १ आणि २ तसेच मध्य रेल्वे-मुख्य मार्गाचे फलाट क्रमांक ३ ते ७ यावरून थेट लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱ्या फलाटांवर जाता येणार आहे. हा पादचारी पूल २७० मीटर लांबीचा असणार आहे. एप्रिल २०१४ पर्यंत या पादचारी पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून पुलाच्या बांधणीसाठी ७ कोटी रुपये खर्च आला आहे. उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये तसेच प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पादचारी पुलाचे काम रात्रीनंतर करण्यात येणार आहे.

काश्मिरी तरुणाला अटक
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रवेशवर्जित भागात घुसखोरी करणाऱ्या एका काश्मिरी तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेतले.  मोहम्मद इब्राहिम मलिक (३०) असे या तरुणाचे नाव असून तो जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी तो मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ‘ऑरेंज गेट’मधून जात असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षारक्षकाच्या जवानांनी त्याला हटकले. मल्लत बंदर येथे जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून या मार्गाचा चुकून वापर केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तो शिक्षक असून डोंगरी मशीद येथे थांबला होता. त्याला मल्लत बंदर येथील डॉ. झाकीर नाईक इस्लामिक इंटरनॅशनल शाळेत जायचे होते. त्याच्यावर परिसरात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

‘एलिमेंटरी’ आणि ‘इंटरमिजिएट’परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई : राज्य सरकारच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘एलिमेंटरी’ आणि ‘इंटरमिजिएट’ चित्रकला श्रेणी या शासकीय रेखाकला परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या दोन्ही परीक्षेत पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या दोन्ही परीक्षांना मिळून ४,१३,२९७ विद्यार्थी बसले होते. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ८९.८९ टक्के लागला असून इंटरमिजिएटचा निकाल ८६.०३ टक्के लागला आहे. पुण्याच्या विन हॅरिक हिने एलिमेंटरी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला असून इंटरमिजिएट परीक्षेत पुण्याच्याच किशोरी सागरने प्रथम येण्याचा बहुमान मिळविल्याचे कला संचालनालयाचे प्रभारी कला संचालक जी.बी. धनोकार यांनी सांगितले.

राज्य सरकारने ८९ कोटींचे पाणी बिल थकवले
मुंबई  : महानगरपालिकेचे पाण्याचे बिल थकवणाऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या कार्यालयांचाही समावेश असून त्यांच्याकडून आजमितीला ८९ कोटी रुपये बिल थकीत असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली. पालिकेकडून पाणी घेणाऱ्यांपैकी तब्बल दोन लाख जणांनी बिल थकवले असून त्यांची रक्कम १००० कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. यात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या विविध कार्यालयांकडूनही पालिकेला पाणी बिलापोटी कोटय़वधी रुपयांची रक्कम मिळणे बाकी असून त्यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस कार्यालयांचा समावेश आहे, असे प्रभू म्हणाले. पाणी बिल वेळेत भरले गेले पाहिजे. अन्यथा नियमानुसार पाणीजोडणी तोडली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.