मुंबई : दादर परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल-एआरआयडीसी) यांच्याद्वारे ब्रिटिशकालीन टिळक पुलाचे काम हाती घेतले आहे. मात्र, पालिका आणि महारेल यांच्या गैरसंवादाचा फटका येथील रहिवाशांना बसणार आहे. टिळक पुलाच्या पिलरच्या स्लॅबचा भाग विष्णू निवास इमारतीला खेटून उभारल्याने, भविष्यात येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागणार आहे.

दादर पूर्व-पश्चिम जोडणारा ब्रिटिशकालीन टिळक पुलावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. त्यामुळे या पुलांचा विस्तार करण्यासाठी पालिका व महारेलद्वारे याठिकाणी केबल स्टेड उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. या पुलाचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे. तसेच या पुलाचे सध्या पायाभरणीचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. असे असताना टिळक पुलाचा काही भाग ८९ वर्षे जुन्या विष्णू निवास इमारतीच्या खिडकीलगत आला आहे. त्यामुळे भविष्यात या उड्डाणपुलामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच रहिवाशांना ध्वनी, वायू प्रदूषणांचा सामना करावा लागेल. भविष्यात उड्डाणपुलावर अपघात घडल्यास, त्याचा परिणाम इमारतीवर होऊ शकतो. त्यामुळे रहिवाशांकडून प्रशासनाशी पत्रव्यवहार करून, योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. टिळक पुलाची रुपरेषा, नकाशा, रचना कसा असेल याबाबतची मंजुरी रेल्वे व पालिका यांनी दिली आहे. त्याद्वारे पुलाची उभारणी केली जात आहे. तसेच या पुलाची रचना सध्याच्या रस्त्याच्या सीमा रेषेतच आहे, असे महारेल-एआरआयडीसीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : ‘टीबी’च्या औषधांचा तुटवडा; तीन महिने औषधे मिळणे मुश्किल, रुग्णांसाठी कसोटीचा काळ

खर्च ३७५ कोटी

● केबल स्टेड पुलाच्या प्रत्येक भागाची एकूण लांबी ६६३ मीटर असून प्रत्येक भागाची रुंदी १६.७ मीटर आहे.

● ये-जा करण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका असतील. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास आणि कोंडी कमी होण्यास मदत होईल.

● या पुलाची एकूण अंदाजे किंमत ३७५ कोटी रुपये आहे.

● या पुलामुळे दादर पूर्व-पश्चिम जोडणारा आणि लोअर परळ, प्रभादेवी आणि वरळी ते पूर्व द्रुतगती मार्गाचा प्रवास सोयीस्कर होईल.

हेही वाचा : मविआचे ठरले, युतीत संभ्रम; काँग्रेस, ठाकरे-शरद पवार गटांचे जागावाटप पूर्ण

माहिती देण्यास पालिकेचा इन्कार

टिळक पुलाबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती घेण्याचा ‘लोकसत्ता’ने प्रयत्न केला असता, पालिकेकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दरम्यान टिळक पुलाच्या उभारणीसाठी पालिकेकडून निधी पुरवला आहे, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. तसेच विष्णू निवास ही इमारत खूप जुनी असल्याने तिचा पुनर्विकास होण्याची शक्यता असल्याने पुलाची उभारणी योग्य असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील पुलाची उभारणी करताना, अधिकारी वर्ग कोणत्या पद्धतीने रुपरेषा तयार करतो, याचे नवल वाटत आहे. गोखले उड्डाणपुलानंतर आता टिळक पुलाचा विषय चर्चेत आला आहे.

झोरू बथेना, सामाजिक कार्यकर्ते