मुंबई : मुंबई महानगरपालिकेने शहरातील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान हाती घेतले असून या अभियानाचा एक भाग म्हणून झाडांवरील फलक, ठोकलेले खिळे, केबल्स काढण्यात येत आहेत. या अभियानांअंतर्गत १५ ते १७ एप्रिल या कालावधीत ३३० झाडांच्या बुंध्यालगत केलेले काँक्रीटीकरण हटविण्यात आले असून झाडांच्या खोडात ठोकलेले तब्बल १४ किलो वजनाचे खिळे काढण्यात पालिकेच्या उद्यान खात्याला यश आले. महापालिकेमार्फत राबविण्यात येणारे हे अभियान येत्या ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानात शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
मुंबईतील वृक्ष संपदा अधिक बहरावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविध उपक्रम हाती घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी महापालिकेने नुकतेच ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ हाती घेतले आहे. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या आदेशानुसार आणि उप आयुक्त अजीत आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. महानगरपालिकेने २०२२ मध्ये सर्वप्रथम वृक्ष संजीवनी अभियान राबवले होते. पहिल्या टप्प्यात हे अभियान अत्यंत यशस्वी झाले होते. त्यामुळे आता अभियानाचा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे.
मुंबईत १५ एप्रिलपासून हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी उद्यान विभागामार्फत पुरेसे मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांसह सुसज्ज पथके तैनात करण्यात आली आहेत. या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे बॅनर / पोस्टर्स, विद्युत तारांचे जंजाळ, वृक्षांच्या बुंध्यालगत केलेले काँक्रीटीकरण काढून टाकण्यात येत आहे. तसेच झाडांभोवतीचे सिमेंट काढल्यानंतर तेथे लाल मातीची भर घालण्यात येत आहे. त्यानंतर झाडांना पुरेसे पाणी टाकले जात आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ३३० झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रीट हटविण्यात आले आहे. तसेच, १ हजार ६७३ पोस्टर, खिळे, झाडांभोवतीचे विद्युत तारांचे जंजाळ हटविण्यात आले. त्यात ४५२ पोस्टर आणि १४.५४५ किलो वजनाच्या खिळ्यांचा समावेश होता.
उद्यान खात्याने अभियानाच्या पहिल्या दिवशी झाडांमधून सुमारे ५.३३ किलो वजनाचे खिळे काढले. तसेच, १३८ झाडांच्या बुध्यालगत केलेले काँक्रीटीकरण हटवून झाडांना नवसंजीवनी दिली. तसेच १३८ जाहिरातींचे पोस्टर हटविले. दुसऱ्या दिवशी ११३ झाडांच्या बुंध्यालगत केलेले काँक्रीटीकरण हटवून ४.६७ किलो वजनाचे खिळे काढले. तर तिसऱ्या दिवशी ७९ झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रीटीकरण हविण्यात आले. तसेच, ४.६४५ किलो वजनाचे खिळे काढण्यात आले. वृक्ष मित्र ग्रुप, डायमंड गार्डन ग्रुप, आनंदी आनंद जेष्ठ नागरिक संस्था आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या अभिनयात सहभाग नोंदवला.
या अभियानाविषयी मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती अभियानात उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था देखील सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागातील रस्त्यालगतच्या वृक्षांवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.