मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मानखुर्द टी जंक्शनलगतच्या महाराष्ट्र नगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबर २०२४ मध्ये हाती घेतले असून या कामासाठी ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, चार महिने उलटले तरीही भुयारी मार्गाच्या एका भागाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या भागात अद्यापही काँक्रीटीकरण सुरू असून संपूर्ण भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनली आहे.

पुलामुळे दिलासा…

शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द टी जंक्शन परिसरातून पलीकडे महाराष्ट्र नगरात जाण्यासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी दोन पदरी मार्ग बांधण्यात आला होता. तसेच, या भुयारी मार्गावरून रेल्वे जात असून नागरिकांना भुयारी मार्गाव्यातिरिक्त अन्य सुरक्षित पर्याय नाही. काही महिन्यांपूर्वी रेल्वे मार्गावरून पादचारी पूल बांधण्यात आल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भुयारी मार्गाची दुरवस्था…

गेल्या काही वर्षांपासून या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली होती. भुयारी मार्गातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. महाराष्ट्र नगरात लोकसंख्या अधिक असून या भुयारी मार्गातून मोठ्या प्रमाणात नागरिकांसह वाहनांची वर्दळ सुरू असते. पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरते. तसेच, दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचात असल्यामुळे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करावा लागत आहे.

भुयाराची दुरुस्तीसह रंगरंगोटी…

नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम डिसेंबर २०२४ मध्ये हाती घेतले. वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्याचे नियोजन पालिकेने केले. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह रंगरंगोटी करून भुयारी मार्ग सुशोभित करण्यात येणार आहे. तसेच, भुयारी मार्गात छतही उभारण्यात येणार आहे. संबंधित काम तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, चार महिने उलटले तरीही काम अपूर्ण आहे. आता केवळ एका भागातील काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाही पावसाळ्यात गैरसोयींचा सामना करावा लागणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही कामे निविदा प्रक्रियेच्या फेऱ्यात…

दरम्यान, हा भुयारी मार्ग सखल भागात असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाणी साचण्याची समस्या सोडविण्यासाठी रेल्वेच्या हद्दीत लघु पाणी उपसा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यात पुरेशा क्षमतेची साठवण टाकी, ताशी तीन हजार क्यूबिक मीटर क्षमतेचे प्रत्येकी तीन पंप बसवणे आदी कामांचा समावेश असून या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे.