मुंबई : ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठय़ात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही. मात्र, सप्टेंबर महिन्यात धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिका येत्या १ ऑक्टोबरला सातही तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे दरवर्षी १ ऑक्टोबरला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जातो. त्यानंतर पुढील वर्षभर मुंबईला कशा प्रकारे पाणीपुरवठा करण्यात येईल, याचे नियोजन केले जाते. मुंबईला उध्र्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दर दिवशी ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सातही तलावांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर एवढी आहे.

हेही वाचा >>> Weather Update: राज्यभरात पावसाचे पुनरागमन; आगामी ४८ ते ७२ तासांत जोरदार पावसाचा अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात धरणक्षेत्रात केवळ १३ लाख १२ हजार दशलक्ष लिटर म्हणजेच ९० टक्के एवढाच पाणीसाठा जमा झाला आहे. जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले होते. मात्र, आता तुळशी, तानसा, मोडकसागर या तलावांमध्ये पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी कमी झाली आहे. गतवर्षी २ सप्टेंबर रोजी सात तलावांचा मिळून एकूण जलसाठा ९७.५१ टक्के एवढा होता. मात्र, यंदा सध्या धरणक्षेत्रात मेअखेपर्यंत पुरेल एवढाच म्हणजे केवळ ९०.६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुंबईत पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे.