मुंबई : मुंबईकरांना आधी चांगली शौचालये द्या, कचरा संकलनासाठी चांगली सोय द्या आणि मगच मुंबईकरांवर दंड लावा अशा सूचना करीत मुंबईकरांनी मुंबई महापालिका प्रशासनाचे कान टोचले आहेत. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका करणे अशा चुकांसाठी मुंबई महापालिका दंड आकारते. त्या दंडाच्या रक्कमेत आता वाढ होणार आहे. त्याबाबतच्या नियमावलीच्या मसुद्यावर हरकती व सूचना नोंदवताना मुंबईकरांनी आपला विरोध दर्शवला आहे. ६६ टक्के मुंबईकरांनी आधी सुविधा द्या आणि मगच दंड आकारणी करा असे म्हटले आहे. तर ५२ टक्के मुंबईकरांनी दंड आकारणीला पाठिंबा दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीचा मसुदा १ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केला होता. सध्या महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहेत. त्यानुसार सध्या दंड आकारणी केली जाते. या उपविधीमध्ये सुधारणा करण्यात येणार असून स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २०२५ चा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर १ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला. त्यावर १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्यांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना व हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. सूचना व हरकती नोंदवताना मुंबईकरांनी काही चांगल्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या यंत्रणेतील त्रुटीही दाखवल्या आहेत.
मुंबईकरांवर कचरा शुल्क लावण्याचे सुतोवाच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्पात केले होते. हे कचरा शुल्क लावण्याकरीता मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र कचरा शुल्क लावण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. मात्र इतर दंड आकारणी नेहमीप्रमाणे केली जाणार असून त्यात वाढ होणार आहे. ही दरवाढ या नव्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईकरांनी सूचना करताना घनकचरा व्यवस्थापन विभागातील त्रुटी दाखवल्या आहेत. कचऱ्याच्या डब्यांची कमतरता, कचरा वेळच्यावेळी उचलला न जाणे, वर्गीकरण केलेला गाड्यांमध्ये भरताना पुन्हा एकत्र केला जाणे, रात्रीच्यावेळी सोय नसणे अशा विविध तक्रारी केल्या आहेत.
दंडात्मक कारवाईला पाठिंबा
दंडात्मक कारवाईला ५२ टक्के मुंबईकरांनी पाठिंबाही दर्शवला आहे. दंड केल्यास नागरिकांच्या सवयींमध्ये सुधारणा होईल असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मात्र दंड वसूल करण्याच्या पद्धतीबद्दल त्यांनी आक्षेप घेतले आहेत. सीसीटीव्ही द्वारे नियंत्रण, डिजिटल पद्धतीने दंड वसूल करावा, किंवा उत्पन्नाच्या प्रमाणात दंड वसूल करावा अशा सूचनाही नागरिकांनी केल्या आहेत.
नव्या नियमावलीनुसार ..
रस्त्यावर कचरा करणाऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेतही सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कचरा टाकल्यास, रस्त्यावर थुकल्यास आतापर्यंत जे दंड वसूल केले जात होते त्यातही वाढ करण्यात आली आहे. रस्त्यावर कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे, तर थुंकणाऱ्यांकडून आता २५० रुपये वसूल केले जाणार आहे.