मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग मार्गी लावण्याच्यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महामार्गातील धाराशीव – कोल्हापूर या तिसऱ्या टप्प्यातील महामार्गाचा पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या टप्प्यातील पर्यावरणीय प्रभाव मूल्याकंनासाठी अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने आता पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यासाला सल्लागाराच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. येत्या तीन – चार महिन्यांत हा अभ्यास पूर्ण करून या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरणासंबंधीची अंतिम परवानगी घेतली जाणार आहे.

चार टप्प्यात पर्यावरण परवानगीसंबंधीचे प्रस्ताव

एमएसआरडीसी मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ८०२ किमी लांबीचा नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सध्या भूसंपादनाच्यादृष्टीने संयुक्त जमीन मोजणीचे काम सुरू आहे. मात्र या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. तरीही हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एमएसआरडीसी हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. एमएसआरडीसीने पर्यावरण मंजुरीसंबंधीचा प्रस्ताव केंद्र, राज्य सरकारला पाठवला होता. मात्र प्रकल्पास असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला होता. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर एमएसआरडीसीने पुन्हा पर्यावरणसंबंधीच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला. वर्धा – हिंगोली या पहिल्या टप्प्यातील महामार्गासह हिंगोली – धाराशीव या दुसऱ्या टप्प्यातील महामार्गासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तर धाराशीव – कोल्हापूर या तिसऱ्या टप्प्यातील महामार्गाचा, कोल्हापूर – सिंधुदुर्ग चौथ्या टप्प्यातील महामार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३२४ किमीच्या टप्प्याच्या अभ्यासाला परवानगी

या प्रस्तावानुसार नुकताच केंद्र सरकारने धाराशीव – कोल्हापूर या ३२४ किमी लांबीच्या टप्प्यातील पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अभ्यासासाठी अटी-शर्तींसह परवानगी दिल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. ही परवानगी मिळाल्याने आता महत्त्वाच्या अशा या टप्प्यातील पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनास सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासाअंतर्गत प्रकल्पामुळे पर्यावरणाची होणारी हानी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तीन ते चार महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर या टप्प्यासाठी पर्यावरणासंबंधीची अंतिम परवानगी मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित टप्प्यातील अभ्यासासाठीच्या परवानगीची प्रतीक्षा एमएसआरडीसीला आहे. एकूणच शक्तिपीठ महामार्गातील एका महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे.