मुंबई : ‘सिंदूर’ या शब्दाशी अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत. परंतु युद्ध हे भावनांनी जिंकता येत नाही. ते शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याने जिंकले जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सरकारने भावनिक फायदे मिळवण्यासाठी निवडले होेते; परंतु याचा जमिनीवर काहीही फायदा होणार नाही, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधी केलेल्या कारवाईबद्दल लष्कराचे अभिनंदन केले. पहलगाम हल्ल्याला १५ दिवस असल्याने काय घडत आहे, याबद्दल लोक चिंतेत होते. निष्पाप लोकांची कत्तल झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल भारत सरकार आणि लष्कराचे अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले. परंतु ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव निवडले असले तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. मतपेढीला खुश करण्यासाठी विधवांच्या भावनांचा आधार घेतला जात असल्याचे ते म्हणाले.चव्हाण यांचे हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले असून काँग्रेसमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी सध्या यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे म्हटले असून, सरकार उचलत असलेल्या कोणत्याही पावलाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणाले.
चव्हाणांचे विधान लज्जास्पद : भाजप
भाजप प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान लज्जास्पद असल्याचे म्हटले. वर्षानुवर्षे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी आपल्या माता-भगिनींचे कुंकू पुसत आहे आणि कालच्या हल्ल्यानंतर कोणताही दहशतवादी पुन्हा असे करण्याची हिंमत दाखवणार नाही, असे ते पुढे म्हणाले. तर आमदार राम कदम यांनी संवेदनशील बाबींना स्वस्त राजकारणाशी जोडण्याची काँग्रेस नेत्यांची जुनीच सवय असल्याची टीका केली.