केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आज सकाळी ११ च्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी तिथपासूनच नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “राज्यातली जनता महाराष्ट्रातील आत्ताच्या सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा कोणताही विकास करू शकत नाही”, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

“जनतेसाठी भाजपा आशेचा किरण”

दरम्यान, यावेळी राज्य सरकारवर टीका करतानाच नारायण राणेंनी जनतेसाठी भाजपा आशेचा किरण असल्याचं म्हटलं. “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत आहे”, असं राणे म्हणाले.

मोदींमुळे बहुजनांचं राज्य बघायला मिळत आहे – देवेंद्र फडणवीस

मोदींच्या आशीर्वादानेच मंत्रिमंडळात, फडणवीसांचा ऋणी

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मंत्रिपद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली”, असं ते म्हणाले.

…तेव्हा जाणवलं मी केंद्रात आलोय!

केंद्रात मंत्री म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत बसल्याचा अनुभव नारायण राणेंनी यावेळी सांगतला. “दिल्लीच्या मंत्रिमंडळात मला दीड महिना झाला. एक वेगळा अनुभव तिथे मला घेता आला. मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात बसताना सुरुवातीला मी केंद्राच्या मंत्रिमंडळात बसलोय असं वाटलंच नाही. मला वाटलं कुठे देवेंद्र फडणवीस दिसतील, आशिष शेलार दिसतील. पण ते दिसलेच नाहीत. तेव्हा मला जाणवलं की आपण केंद्रात आलोय”, असं ते म्हणाले.