मुंबई : लोकांना कर्ज माफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे असते, म्हणून काहीतरी आश्वासने निवडणुकीच्या वेळी देत असतो. पण, काय मागायचे ते लोकांनी ठरवले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. या असंवेदनशील विधानावर टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव करीत पाटील यांनी माफी मागितली आहे.
जळगावमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करून बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेतला आहे. वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आल्यानंतरही वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे.
लोकांना कर्ज माफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे असते, म्हणून काहीतरी आश्वासने निवडणुकीच्या वेळी देत असतो. निवडणुकीच्या काळात समजा कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केली तर निवडून यायचे असल्याने नदी आणून देऊ असेही आश्वासन दिले जाते. त्यामुळे काय मागायचे, हे लोकांनी ठरवले पाहिजे, असे पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर पाटील यांनी सारवासारव करीत माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचा अपमान करणारे विधान
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेले विधान ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री पाटील यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तर, पाटील यांचे विधान संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. अगोदरच अतिवृष्टीने शेतकरी हैराण आहेत. त्यात अतिवृष्टी मदतीत अटी शर्ती टाकल्यामुळे व अनेक जिल्हे, गावे वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संताप आहे. निवडणुकीत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात राग खदखदतो आहे, अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डिवचणारी केली जात आहेत, असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.