मराठा आंदोलकांनी आरक्षण वैध ठरल्याच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. त्यावेळी मराठा-मराठेतर वाद विसरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एकत्र या असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. ज्यावर आता नीलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्या असल्याने उद्धव ठाकरेंनी असे वक्तव्य केले. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर तर महाराज कधीच यशस्वी झाले नसते. महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकावरून खाली फेकले असते अशी खोचक टीका नीलेश राणे यांनी केली आहे.

नारायण राणे असोत, नीलेश राणे किंवा नितेश राणे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी हे तिन्ही नेते सोडताना दिसत नाहीत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि इतर काही नेते जेव्हा उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांचे त्यांनी आभार मानले आणि दिल्लीत मराठा आरक्षणाची लढाई रंगली तर पाठिंबा द्या अशीही विनंती केली. ज्यानंतर मराठा आरक्षणासाठी कायमच शिवसेना तुमच्या सोबत राहिल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. मात्र यावर नीलेश राणे यांनी टीका करत उद्धव ठाकरेंसारखे मावळे असते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना टकमक टोकावरून खाली फेकले असे अशी टीका केली आहे.

याआधीही मे महिन्यात एक ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून नीलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी ठेकेदार मिळत नसल्याची बातमी समोर आली होती. ज्यानंतर ठेकेदार हुशार आहेत त्यांना माहित आहे उद्धव ठाकरे यामध्येही ५ टक्के मागतील अशी टीका नीलेश राणे यांनी केली होती. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी जे म्हटले आहे त्याचा समाचार नीलेश राणेंनी घेतला आहे. आता या टीकेला उद्धव ठाकरे उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.