मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. आधीच बेपत्ता असलेल्या परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी ठाण्यातील न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. त्यामुळे त्यांच्यावर अटेकची तलवार कायम टांगलेली असणार आहे.

परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेने नोटीस पाठवून १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. यानंतर आता गुन्हे शाखेने सिंह यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटसाठी अर्ज केला. न्यायालयाने गुन्हेशाखेच्या अर्जावर सुनावणी करताना परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं.

“परमबीर सिंहांवर बिल्डरकडून ९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप”

गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरने ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तसेच सचिन वाझेला आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते. परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून सरन्यायाधीश आणि कायदा मंत्र्यांसमोरच परमबीर सिंह यांना कोपरखळी, म्हणाले…

हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सिंह यांना नोटीस बजावण्यात आली होती. तक्रारीनुसार, जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.