मुंबई : राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना स्थिरस्थावर झाल्यानंतर आता परदेश दौऱ्याचे वेध लागले आहेत. त्यानुसार विधिमंडळाच्या विविध समित्यांचे परराज्यात, परदेशात दौरे आयोजित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यावर विविध समित्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या आमदारांची निवड करून त्यांचे परदेशामध्ये अभ्यास दौरे पाठविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यात गेली पाच वर्षे विधिमंडळ समित्यांचा ठप्प झालेला कारभार पुन्हा सुरू करण्यात आला असून, नव्याने गठीत झालेल्या विधिमंडळ समित्यांचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ समित्यांचे परराज्यात, परदेशात अभ्यास दौरे आयोजित करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही दुजोरा दिला. त्यावर संपूर्ण समितीला नाही, मात्र विविध समित्यांमध्ये चांगले काम करणाऱ्या सदस्यांची निवड करून त्यांचे परदेश दौरे आयोजित केले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. या वेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी सूत्रसंचालन केले.