मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, देशाची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. ‘यूपीए’ सरकारने १० वर्षात दिलेल्या निधीपेक्षा अधिक निधी मोदी सरकारने एका वर्षात महाराष्ट्रातील रेल्वेप्रकल्पांसाठी दिला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीविषयी माहिती देताना पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. राज्यात रेल्वेचे पावणेदोन लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत.
यूपीए सरकारच्या काळात १० वर्षांत राज्याला रेल्वेकरिता मिळाले होता, त्याहूनही अधिक निधी मोदी सरकारने एका वर्षात दिला. मोदी सरकारच्या सहकार्यातून राज्यात पायाभूत सुविधांची सहा लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. एकाच वर्षात राज्यातील गरीब लाभार्थींकरिता ३० लाख घरे मंजूर करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला, असेही त्यांनी नमूद केले. मोदी सरकारच्या कामगिरीचा तपशील असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन फडणवीस यांनी केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यांची तयारी असल्यास जाहीर चर्चा करण्यास मी तयार आहे, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. गांधी यांच्या पत्रावर आयोगाने त्यांना ७० पानी सविस्तर उत्तर पाठविले आहे. त्यानंतर त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा उरलेला नसल्याने ते आता प्रसिद्धीमाध्यमांमधून बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले.
शिवस्मारकाचा वाद उच्च न्यायालयात
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा वाद सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे सुनावणी पाठविला आहे. त्यावर लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयास केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.