मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडल्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. मुंबईत सोमवारी मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी मुंबईत पाणी तुंबण्यास शिवसेना ठाकरे गट आणि पूर्वीचे महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करत आरोपांना प्रत्युत्तर दिले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसावरून पडसाद
मुंबई : पावसाळ्यामध्ये मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी हाती घेण्यात आलेले प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू असून, त्याला जबाबदार कोण, तसेच हे प्रकल्प कोणामुळे रखडले? अशी विचाराणा करीत पालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत भाजपच्या मंत्र्यांनी केल्याचे समजते.
मंत्रिमंडळ बैठकीत आशीष शेलार यांनी मुंबईच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. ‘सोमवारच्या घटनेवरून सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र ही जबाबदारी महापालिकेची आहे. शहरामध्ये पावसाळ्यात पाण्याचा वेळीच निचरा व्हावा यासाठी हजारो कोटी रुपयेे खर्चून ‘ब्रिमस्टोवॅड’ प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. मिठी नदीतील गाळ काढण्याचे कामही अपूर्ण असून त्यातील गाळ काढण्याच्या कामात मोठा घोटाळा झाला आहे. याची चौकशी सुरू असून अजूनही आरोपींवर कारवाई नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहरातील अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आल्यामुळे कामे रखडली. एकूणच सोमवारच्या घटनेला पालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता असलेली शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा ठपका शेलार यांनी ठेवल्याचे समजते. त्यासाठी पालिकेची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून अनेकांचा जीव जातो. अशा दुर्घटना टाळण्यासाठी खासगी जागेतील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठीचे शुल्क पालिकेने माफ करावे. त्यामुळे लोक स्वतः झाडांच्या फाद्या तोडतील. तसेच दरडप्रवण क्षेत्रातील धोकादायक दरडींना संरक्षक जाळ्या लावण्याचे काम म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. मात्र यासाठी पालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री शेलार यांनी बैठकीत केल्याचे समजते.
मुंबईतील पुराला सरकारच जबाबदार : आदित्य ठाकरे
मुंबई : मुंबईत पावसानंतर जो गोंधळ निर्माण झाला, तो पावसामुळे नव्हे तर ते सरकार आणि मुंबई महापालिकेचे अपयश आहे. मुंबई पालिका गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयातून, नगरविकास खात्यातून चालते, हे अपयश त्यांचेच आहेत. दोन-तीन वर्षांपासून हा भ्रष्टाचार सुरू असून मुंबई तुंबली त्याला ‘भ्रष्टनाथ’ शिंदे आणि मुंबई महापालिका जबाबदार असल्याची टीका करताना मुंबईकरांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना (आमदार) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
याआधी झालेल्या पावासात अंधेरी, साकीनाका परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीतून महापालिकेने धडा घ्यायला हवा होता. तीन वर्षांपूर्वी महापालिका प्रत्येक पावसासाठी तयारी करायची. मात्र यंदा महापालिकेची तयारीच दिसली नाही. पावसानंतर ज्यांच्या घरात, दुकानात पाणी गेले असेल, त्यांना सरकारच्या तिजोरीतून नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी आदित्य यांनी केली.
सोमवारच्या पावसात रस्ते घोटाळ्याची जाणीव झाली असेल असे म्हणत ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, दहिसर येथे सर्वत्र रस्ते खोदले गेले आहेत. मंत्रालयासमोर पहिल्यांदा पाणी तुंबले, ‘ब्रीच कँडी’जवळ नवीन रस्ता खचला. हिंदमाता जंक्शन, गांधी बाजार या दोन्ही ठिकाणांना ३ वर्षांपूर्वी पूरमुक्त करून दाखवले होते, मात्र आज परिस्थिती बिकट आहे. शिंदे यांचा भ्रष्टाचार सगळीकडे दिसू लागला आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
शासन आणि प्रशासन मजा-मस्तीत, सरकार फोडाफोडीत व्यग्र आहे. त्यामुळे मुंबईत ज्या ठिकाणी पाणी भरत नव्हते तिथेही पाणी भरले गेले, असे सांगत भाजपने याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. मेट्रो-३ मध्ये पाणी तुंबले. हे काम तुर्कीश कंपनीला देण्यात आले होते. या कामाला ७१८ भेगा पडल्या आहेत. मुंबईला धोका पोहोचवण्याचा या कंपनीचा हेतू तर नव्हता ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
ठाकरेंच्या राशीत मदत शब्द आहे का? : राणे
मुंबईत झालेल्या पावसानंतर सरकारला आणि लोकांना मदत करायची सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने ठाकरे खडे फोडत आहेत. दुसऱ्यांवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी आतापर्यंत बुडालेल्या लोकांना किती मदत केली. उद्धव ठाकरेंच्या राशीत मदत शब्द आहे तरी का? असा पलटवार भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये. शिंदे बिचारे काही बोलत नाहीत. परंतु, माझ्याकडे १९८५ पासूनचा हिशेब आहेत. आम्हाला बोलायला लावू नका, आदित्य ठाकरे यांनी मोदी, शहा, फडणवीस यांच्याविषयी बोलू नये, असा सूचक इशारा राणे यांनी दिला.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत
– राज्यात यंदा अंदाजापेक्षा १५ दिवस आधीच पावसाचे आगमन झाले. त्यात सोमवारी दक्षिण मुंबईत एका तासात २०० मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शहरात पाणी साचले. तसेच राज्यात अतिवृष्टीत आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात येणार आहे.
– राज्यात चांगला पाऊस होत असला तरी आजमितीस १,४५० टँकरच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू असून त्यातील ६४७ टँकर एकट्या छत्रपती संभाजी नगरात सुरू असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यता आली.