आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशभरातील २८ विरोधी पक्ष एकवटले आहे. विरोधी पक्षांच्या या इंडिया आघाडीची सध्या मुंबईत बैठक सुरू आहे. मुंबईच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये खलबतं सुरू आहेत. दरम्यान, या बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार? आघाडीचा पुढचा कार्यक्रम काय असेल? विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार? लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यापैकी काही प्रश्नांची उत्तरं बैठक संपल्यानंतर मिळू शकतात.
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा सुरू आहे? आघाडीतल्या पक्षांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी एखादी समन्वय समिती बनवली जाणार आहे का? अशा प्रश्नांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उत्तरं दिली आहेत. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या आजच्या बैठकीत समन्वय समिती बनवली जाईल. तसेच एका मुख्य समन्वयकाची नियुक्ती होऊ शकते. आगामी काळात सर्व पक्षांमधील संवाद आणि समन्वय कसा राखता येईल याबाबत चर्चा होईल. तसेच इंडिया आघाडीची पुढची दिशा काय असेल याबद्दल निर्णय घेतला जाईल. यासह लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर महत्त्वाची चर्चा होईल.
खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, जागावाटपासह इंडिया आघाडीची रचना कशी असेल? यावर प्रामुख्याने चर्चा होणं अपेक्षित आहे. या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन काही व्यापक निर्णय घेतले जातील. बैठक पार पडल्यानंतर संध्याकाळी याबाबतची माहिती जाहीर केली जाईल.
हे ही वाचा >> “अहो केसरकर, एखाद्यानं शुक्-शुक् केल्यावर पळावं तसं तुम्ही…”, सुषमा अंधारेंचा टोला; अजित पवारांचा केला उल्लेख
गणेशोत्सवाच्या काळात संसदेचं अधिवेशन बोलावल्यामुळे प्रियंका चतुर्वेदींची नाराजी
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात हे अधिवेशन बोलावल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, केंद्र सरकारने राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना विशेष अधिवेशनासाठी बोलावलं आहे. एकीकडे देशात इतका मोठा सण साजरा केला जाणार आणि त्याचवेळी सरकारने संसदेचं अधिवेशन बोलावलं आहे. देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हिंदूंचा हा महाराष्ट्रातला खूप मोठा सण आहे. केंद्र सरकार हिंदूविरोधी काम करत आहे, हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम करत आहे.