मुंबई : दक्षिण मुंबईतील बाणगंगा तलावाजवळील संरक्षण भिंतीचा काही भाग रविवारी सकाळी अचानक कोसळला. तलावाच्या परिसरातील महालक्ष्मी मंदिराच्या जवळच ही भिंत आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी नाही.
दक्षिण मुंबईतील ग्रॅंटरोड पश्चिम येथील मलबार हिल परिसरात वाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या जवळची संरक्षक भिंत रविवारी पहाटे पावसामुळे कोसळली. संरक्षक भिंतीचा सुमारे १०-१५ फूट भाग कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
घटनास्थळी पालिकेच्या डी विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिसर सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेडिंग केले आहे. नागरिकांनी त्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरावस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
दरम्यान, रविवारी भिंत पडली ती त्या प्रकल्पाचा भाग नव्हती. मात्र हा तलाव पुरातन असल्यामुळे सोमवारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांनी दिली. बाणगंगा तलाव हे मुंबईतील एक महत्त्वाचे सांस्कृतिक व धार्मिक वारसास्थळ असून, दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी भेट देत असतात.
गिरगाव चौपाटी येथून मलबार हिलच्या टेकडीवर चढण चढून गेल्यानंतर टेकडीच्या पश्चिम किनाऱ्यावर टोकाला हा परिसर येतो. हा परिसर आजूबाजूने समुद्राने वढेलेला असताना त्यात मध्यभागी हे गोड्या पाण्याचे कुंड असल्यामुळे या बाणगंगा तलावाविषयी विशेष आकर्षण आहे. तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून तलाव परिसराला धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे.