मुंबई: सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असून ठिकठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाची कल्पना नसलेल्या मुंबईकरांनी सकाळीच कार्यालयाची वाट धरली आहे. मुंबईतील पावसाचा जोर वाढत असून मुंबईकर नोकरदारवर्गाची तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. छत्री घरी विसरल्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकांच्या छपराखाली आडोसा घेत पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकजण जवळपास तासभर गाड्यांमध्ये अडकले आहेत.

मुंबईत मुसळधार पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावली असून रेल्वेची वाहतूकही संथ गतीने सुरु आहे. तसेच शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीही पाहायला मिळत असून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. तसेच बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत कार्यालयात तसेच इच्छितस्थळी पोहोचावे लागत आहे.

मात्र ऐन उन्हाळ्यात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसाची मुंबईकर नागरिकांना कल्पना नसल्यामुळे लाखो मुंबईकर छत्रीविना घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे काही नागरिक रेल्वे स्थानकांजवळ कोणकोणत्या दुकानात छत्री उपलब्ध आहे का? हे पाहत आहेत. तर काही नागरिकांनी घरी राहणे पसंत केले असून घरबसल्या गरमागरम चहा आणि कांदाभजीचा आस्वाद घेत आहेत.

दरम्यान, छत्रीविना घराबाहेर पडलेले बहुसंख्य नोकरदार रेल्वेस्थानकांच्या पूलावर आणि पदपथाच्या बाजूला असणाऱ्या दुकानांच्या छपराखाली थांबत पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. तर काहींनी रेल्वे स्थानकांच्या फलाटावर थांबणे पसंत केले असल्यामुळे मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण वेळेत कामावर पोहोचू का? आज लेटमार्क लागेल का? असे विविध प्रश्न कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला पडलेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.