महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. राष्ट्रपती भवनाने देशातील १३ राज्यपालांची बदली केली. याआधी रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपालपदही सांभाळले होते.

कोण आहेत रमेश बैस?

२ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या रमेस बैस यांनी वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे.

छत्तीसगढच्या रायपूरमधून सुरुवात

रमेश बैस यांनी छत्तीसगढ मधील रायपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व केलेले आहे. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत निवडून आले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. १९८० पासून १९८४ पर्यंत ते मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९८९ मध्ये तेव्हाच्या एकत्रित मध्य प्रदेश (आता छत्तीसगढ) च्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार बनले. त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. लालकृष्ण अडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले, असे त्यांचे समर्थक म्हणतात.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले भगतसिंह कोश्यारींचे प्रगतीपुस्तक, इतिहासाला दिले ‘इतके’ गुण, खास शेरा देत म्हणाले, “सदर विद्यार्थ्याची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कधीच निवडणुकीत पराभूत झाले नाहीत

भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिपदाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत. लागोपाठ विजय मिळूनही २०१९ मध्ये त्यांचे तिकीट कापले गेले. बैस यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला केले गेले. मात्र २०१९ ची लोकसभा निवडणूक पार पडताच. त्यांची वर्णी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून केली गेली. लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच सुषमा स्वराज यांच्यासोबतही त्यांचे संबंध चांगले होते. सुषमा स्वराज या रमेश बैस यांना आपला बंधू मानत होत्या.