मुंबई : हवामान बदलामुळे वाढलेल्या तापमानासह विविध नैसर्गिक आपत्तींचा जगभरातील शेतीला मोठा फटका बसतो आहे. अतिवृष्टी, अति उष्णता, अति थंडीसह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका केळी पिकाला बसतो आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील ६० टक्के केळी लागवडीला फटका बसला आहे. यंदा जळगाव परिसरातील केळीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसून आला आहे.

‘ख्रिश्चन एड’ या संशोधन संस्थेने ‘गोइंग बनानाज: हाउ क्लाइमेट चेंज थ्रेट्स द वर्ल्ड्स फेवरेट फ्रूट’ या संशोधन अहवालात हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि तापमान वाढीचा केळी पिकावरील परिणामांचा आढावा घेतला आहे. त्यात म्हटले आहे. केळी हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतर सर्वाधिक आयात होणारे फळ आहे.

जागतिक व्यापाराच्या आणि पोषण मूल्याच्या दृष्टीनेही केळी महत्त्वपूर्ण आहे. पण, हवामान बदलामुळे प्रामुख्याने तापमान वाढीसह अति थंडी, गारपीट, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे लॉटिन अमेरिका, कॅरेबियन देशांना तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसत असून, २०८० पर्यंत एकूण केळी लागवडीपैकी ८० टक्के आणि जगातील अन्य केळी उत्पादक देशांमधील ६० टक्के क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. सध्या एकूण जागतिक केळी लागवडीच्या ६० टक्के क्षेत्राला तापमान वाढीच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे.

जगातील चार कोटींहून जास्त लोकांच्या दैनंदिन आहारात केळीचा पूरक आहार म्हणून समावेश असतो. त्यामुळे केळी पिकाचे संभाव्य नुकसान अन्न सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणार आहे. केळीसाठी १५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि ६० टक्के आद्रर्ता पोषक असते. पाण्याचा ताण केळीला सहन होत नाही. अन्य फळांच्या तुलनेत केळीला जास्त पाण्याची गरज असते.

तापमान वाढीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढतो. केळीचे खोड, झाड कमकुवत होते. अशा काळात वादळी वारे, सोसायट्याचा वारे वाहिल्यास केळीची झाडे मोडून पडतात. तापमान वाढीमुळे ब्लॅक लीफ फंगस, या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, ही बुरशी केळीसाठी धोकादायक ठरत आहे. ब्लॅक लीफ फंगसमुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत तब्बल ८० टक्के कमी होते. ओलसर जागेत वेगाने प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सध्या जगभरात तापमान वाढीमुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तापमान वाढ मोठा धोका तापमान वाढीच्या काळात हवेतील आद्रर्ता कमी होते. त्यामुळे केळीची वाढ खुंटते. झाडातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाने निर्जीव होतात. अशा वेळी वादळी, सोसाट्याचे वारे वहिल्यास केळीची झाडे मोडून पडतात. तापमान वाढीमुळे उत्पादनावरही परिणाम होतो. राज्यात आता वर्षभर लागवड होत असल्यामुळे तापमान वाढ कळीचा मुद्दा ठरत आहे, अशी माहिती जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे निवृत्त उद्यानवेत्ता सी. डी. बडगुजर यांनी दिली.