मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी येत्या ११ नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नागरिकांना १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरक्षणावर हरकती व सूचना सादर करता येतील.

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाबाबत अधिसूचना काढली आहे. राज्य सरकारने यापूर्वी ९ ऑक्टोबरला मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याच्या पद्धतीबाबतची नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याच्या प्रयोजनार्थ आगामी निवडणूक ही पहिली निवडणूक म्हणून ग्राह्य धरण्याबाबत तरतूद केली आहे. त्यामुळे यावेळी आधीचे आरक्षण विचारात न घेता नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील नॅशनल महाविद्यालयासमोरील ‘बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर, शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तर, १४ ते २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

मुंबई महानगरपालिकेचे २२७ प्रभाग असून त्यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात. तर अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २, इतर मागासवर्गासाठी ६१ जागा राखीव असतात. या राखीव जागांमधील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात.

शाळेचे विद्यार्थी काढणार सोडत

सोडत काढण्याबाबतही निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यानुसार यंदाही शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे सोडत काढली जाणार आहे. पारदर्शक अशा काचेच्या डब्यात २२७ प्रभागांच्या चिठ्ठ्या ठेवण्यात येणार असून त्यातून विविध आरक्षणाच्या सोडती काढण्यात येणार आहेत. २२७ प्रभागांसाठी सोडत काढण्याची प्रक्रिया यंदा दृकश्राव्यमाध्यमातून दाखवण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया सुमारे चार ते पाच तास चालणार आहे.