मुंबई : सेवानिवृत्त तसेच दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईतील वरळी, नायगांव, ना. म. जोशी मार्ग, शिवडी येथील मुंबई विकास विभाग (बी.डी.डी.) चाळींचा पुनर्विकास जलद गतीने होण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार बीडीडी चाळींमध्ये गृह विभागामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांना जी सेवा निवासस्थाने दिलेली आहेत ती त्वरित रिकामी करून देण्याबाबत व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसेच दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी निवासस्थाने कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या समितीचे सहअध्यक्ष असून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, अपर मुख्य सचिव (गृह), प्रधान सचिव (गृहनिर्माण), सहपोलीस आयुक्त (प्रशासन), मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ हे या समितीचे सदस्य असतील. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.