आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नगरसेवकांची कामे उरकण्यासाठी लगबग

निवडणूक येती शहरा..

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये आता अहमहमिका सुरू झाली आहे. मतदारांना ‘दिसतील’ अशी कामे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उरकण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पायवाटांवर लाद्या बसवणे, गटारे, शौचालयांची दुरुस्ती, रस्त्यांवरील दुभाजक नीटनेटके करणे, छोटेखानी उद्यानांच्या सुशोभिकरणाची कामे, रंगरंगोटी सुरू आहे.

नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील छोटी-मोठी नागरी कामे करता यावी यासाठी त्यांना प्रशासनाकडून दरवर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नगरसेवक निधीच्या रुपात एक कोटी रुपये, तर प्रभाग निधीच्या रुपात ६० लाख रुपये निधी देण्यात येतो. या निधीचा वापर करुन अनेक कामे केली जातात. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुका जवळ येताच लोकप्रतिनिधी आपापल्या विभागात नागरी कामांचा सपाटा लावतात. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक आता वेगाने कामाला लागले आहेत. दुरुस्ती, सुशोभिकरण, नूतनीकरणाचे छोटे प्रकल्प प्रशासनाला सादर करुन त्यासाठी ई निविदा मागवल्या आहेत. काही भागांत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यादेश देऊन प्रत्यक्षात कामेही सुरू झाली आहेत. झोपडपट्टय़ांमधील पायवाटा, शौचालये, लहान रस्ते, पदपथांची दुरुस्ती अशा नागरिकांच्या वर्षांनुवर्षीच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होऊ लागल्या आहेत. गेली काही वर्षे फरशा फुटलेल्या, घाणीने माखलेल्या, निरस दिसणाऱ्या दुभाजकांकडे नगरसेवकांचे लक्ष वळले असून दुभाजकांचे सुशोभिकरण सुरू झाले आहे. उड्डाणपुलांखालील जागेवर छोटेखानी बगिचे फुलवण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांना सहज आकर्षून घेण्याचे हमखास ठिकाण झालेले सेल्फी पॉइंट उभे करण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी, पथदिवे आदी विविध छोटी-मोठी कामे पूर्ण होत आली आहेत.

आरक्षण बदलण्याची धास्ती

आरक्षण बदलण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरसेवकांनी केवळ आपल्याच नाही, तर लगतच्या दोन, तीन प्रभागांमध्ये नगरसेवक, प्रभाग निधीतून कामे करण्यास सुरुवात केली होती. मात्र काही नगरसेवकांनी सादर केलेल्या कामांच्या प्रस्तावांची निविदा प्रक्रियाच सुरू झालेली नाही. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर अखेर अथवा जानेवारीच्या सुरुवातीला लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कामे पूर्ण करण्यात येतात. मात्र काही नगरसेवकांच्या कामांचे प्रस्ताव निविदा प्रक्रियेतच अडकले आहेत.

मोठय़ा प्रकल्पांकडे डोळे

मुंबईमधील अनेक मोठय़ा रस्त्यांची, तसेच आकाशमार्गिकांच्या (स्कायवॉक) दुरुस्तीची कामे अपेक्षित आहेत. त्याचबरोबर दहिसर, पोयसर या नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाची घोषणा झाली आहे. पालिकेच्या काही शाळांची दुरुस्ती होऊ घातली आहे. मात्र या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास अद्यापही सुरुवात झालेली नाही. मोठय़ा प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटनाकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमांकडे केवळ स्थानिक नगरसेवकच नाही तर राजकीय पक्षांचेही डोळे लागले आहेत.

उद्घाटन, लोकार्पणाबाबत अनिश्चितता

पालिकेची निवडणूक कधी होणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक, प्रभाग निधीमधून करण्यात आलेल्या नागरी कामांचे समारंभपूर्वक उद्घाटन, लोकार्पण कधी करायचे असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहिता लागू झाली तर पूर्ण झालेल्या नागरी कामांचे उद्घाटन, लोकार्पण करता येणार नाही, अशी धास्ती नगरसेवकांना वाटत आहे.