मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे आखाती देशात नोकरीसाठी जाण्यासाठी आलेल्या सहा तरुणांना सहार पोलिसांनी अटक केली. हे तरुण बिहार मार्गे भारतात आले होते. एका दलालामार्फत त्यांनी बनवाट परदेशी नोकरीचा परवाना तयार केला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. नेपाळी तरूणांना बनावट परदेशी रोजगाराचा परवाना काढून पाठवणारी टोळी यामागे असल्याचा संशय आहे.
रामइक्बाल धानुक (२७) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याकडे नेपाळचे पारपत्र होते. त्याने तपासणीसाठी इमिग्रेशन काऊंटरवर आपले पारपत्र, बोर्डीग पास, युएईचा व्हिसा आणि परदेशी नोकरीचा परवाना (एफईपी) इत्यादी सादर केले. तो युएईला पहाटे २ च्या विमानाने जाणार होता. मात्र तपासणीदरम्यान इमिग्रेशन काऊंटर अधिकारी अजय म्हात्रे यांना त्याच्या परदेशी नोकरीचा परवाना (एफईपी) संशयास्पद वाटला. त्याबाबत विचारणा केली असता त्याला योग्य उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्याला पुढील कारवाईसाठी विंग प्रमुख रंजन कुमार साहू यांच्याकडे हजर करण्यात आले. त्याचवेळी मोहम्मद आलम, राकी यादव, मोहम्मद मणीहार, मोबीन मुसलमान, जोगींद्र यादव हे अन्य पाच नेपाळी तरूण इमिग्रेशन काऊंटवर आले. तेही युएई आणि कतारला नोकरीनिमित्त जाण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे असलेला परदेशी नोकरीचा परवाना संशयास्पद वाटला. त्यामुळे खातरजमा करण्यासाठी या सहा तरुणांचे नाव परदेशी नोकरीच्या परवान्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील यादीत आहे की नाही हे तपासण्यात आले. चौकशीमध्ये हे सहा जण बनावट परदेशी नोकरी परवाना तयार करून युएई आणि कतारला नोकरीसाठी जात असल्याचे उघड झाले. या सहा जणांविरोधात सहार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३४० (२), ३३६ (३), ३१८ (४) आणि ३३६(२) अन्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रस्तेमार्गाने बिहारमध्ये केला प्रवेश
नेपाळी नागरिकाला (नेपाळ व्यतिरिक्त) भारतातून इतर कोणत्याही देशात जायचे असेल तर त्याला भारतातील नेपाळी दूतावासाकडून ‘ना हरकत’ दाखला (एनओसी) घ्यावा लागतो किंवा नेपाळच्या परदेश मंत्रालयाकडून परदेशी नोकरी परवाना (फॉरेन एम्लॉयमेंट परमिट) मिळवावा लागता. त्याशिवाय कुणाही नेपाळी नागरिकाला भारतातून परदेशात जाता येत नाही. या सहा जणांनी आखाती देशात जाण्यासाठी एका नेपाळी दलालासोबत संपर्क सादला होता. त्यासाठी त्यांनी दलालाला नेपाळच्या चलनातील १ ते अडीच लाख रुपये दिले होते. दलालाने त्यांना व्हिसा आणि बनवाट नोकरीचा परवाना बनवून दिला होता. ठरलेल्या योजनेनुसार ते नेपाळवरून रस्तेमार्गाने बिहारमध्ये गेले. तेथून विमानाने मुंबईला आले. मुंबईहून त्यांचा आखाती देशात जाण्याचा प्रयत्न होता. परंतु विमानतळाच्या इमिग्रेशन काऊंटरवर त्यांचे पितळ उघडे पडले.