मुंबई : बनावट परवान्याच्या आधारे भारतातून आखाती देशात नोकरीसाठी जाणाऱ्या ४ नेपाळी तरूणांना सहार पोलिसांनी अटक केली आहे. ते नेपाळहून बिहार मार्गे भारतात आले होते. मागील आठवड्यात अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे परदेशात जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या ६ नेपाळी तरूणांना अटक करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील राधा मोरे या इमिग्रेशन काऊंटरवर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे गुरूवार २९ मे रोजी जोगेंद्र दास, अनिस कुमार दास, सिंधू कुमार झा आणि जोगेंद्र झा असे ४ प्रवासी इमिग्रेशन तपासणीसाठी आले. हे सर्व तरुण नेपाळचे नागरिक होते. त्यांच्याकडे युएई या देशाचा व्हिसा तसेच परदेशी नोकरीचा परवाना (एफईपी) होता. ते चौघे जण दोहा आणि दुबई येथे नोकरीसाठी जात होते.
मोरे यांना त्यांच्या परदेशी नोकरीच्या परवान्याबद्दल (एफईपी) संशय आला. त्यांनी ही बाब विंग प्रमुख विक्रमकुमार आणि प्रत्युश पांडे यांना सांगितली. त्यांच्या चौकशीत या चौघांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे खातरजमा करण्यासाठी त्या ६ तरुणांची नावे नेपाळ सरकारच्या परदेशी नोकरीचा परवाना देणाऱ्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील यादीत आहे की नाही हे तपासण्यात आले. मात्र तेथे त्यांचे नाव नव्हते. त्यानंतर त्या चौघांचा परदेशी नोकरीचा परवाना (एफईपी) ईमेलद्वारे तपासणीसाठी नेपाळी दुतावासाकडे पाठवला होता. नेपाळी दूतावासाने चौघांना अशाप्रकारचा परवाना दिला नसून त्यांच्याकडे असलेला परवाना हा बनावट असल्याचे कळवले. त्यामुळे त्या चौघांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या विरोधात सहार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३४०(२), ३३६ (३), ३१८ (४) आणि ३३६(२) अन्वये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती देताना सहार पोलिसांनी सांगितले की एका नेपाळी एजंटच्या मार्फत ते चौघे भारतात आले होते. आधी ते रस्तेमार्गाने बिहारच्या पटणा येथे आले. नंतर विमानाने मुंबईत आले होते. अशाप्रकार बेकायदेशीर परदेशी नोकरीचा परवाना (एफईपी) तयार करून परदेशात पाठविणारी टोळी सक्रीय असल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. मागील आठवड्यात अशाच प्रकारे बनावट परवाना तयार करून आखाती देशात जाणाऱ्या ६ नेपाळी तरूणांना अटक करण्यात आली होती.
नियम काय सांगतो?
भारतातून ज्या नेपाळी नागरिकाला (नेपाळ व्यतिरिक्त) इतर कोणत्याही देशात जायचे असेल तर त्याला भारतातील नेपाळी दूतावासाकडून ना हरकत दाखला (एनओसी) घ्यावा लागतो किंवा नेपाळच्या परदेश मंत्रालयाकडून परदेशी नोकरी परवाना (फॉरेन एम्लॉयमेंट परमिट) मिळवावा लागतो. त्याशिवाय कुणाही नेपाळी नागरिकाला भारतातून परदेशात जाता येत नाही.