शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर अनेक दिवस चर्चेत नसलेला सीमावादाचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे या सीमावादाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध जोडला जात आहे. एका विशिष्ट व्यक्तीला हे टेंडर मिळावं आणि त्याला विरोध होऊ नये म्हणून हा वाद पुढे आणला जात आहे, असा आरोप होतोय. याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (६ डिसेंबर) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, अजिबात नाही. त्याची चर्चाही करायचं कारण नाही. महाराष्ट्राचा सीमावाद हा अधिक गंभीर प्रश्न आहे. कुणाचं टेंडर आणि कुणाचं काय हा विषय आता चर्चेचा नाही. सीमावादाच्या प्रश्नाला इतकंही कमी लेखलं जाऊ नये.”




शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा
कर्नाटकातील बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. शरद पवार यांनीही या घटनेवरून निषेध नोंदवत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
“मला स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले”
शरद पवार म्हणाले, “राज्य-कर्नाटक सीमेच्या बाबतीत झालं, ते अत्यंत निषेधार्थ आहे. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रकरण सुरु आहे. सीमा भागाशी मी अनेक वर्षे संबंधित आहे. मला स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले.”
हेही वाचा : “…नाहीतर मला बेळगावात जावं लागेल”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला ४८ तासांचा वेळ
“पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे”
“दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवाळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. अन्यथा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे, की संसदेत भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.