मुंबई : मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील ब्रिटिशकालीन ११२ वर्षे जुन्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात तो वाहतुकीसाठी खुला होण्यास एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. शीव उड्डाणपूल खुला करण्यासाठी मुबंई महापालिका प्रशासनाने ३१ मे २०२६ चे उद्दीष्ट्य ठरवले आहे. तर मुंबई सेंट्रल येथील बेलिसस उड्डाणपूल या वर्षाच्या अखेरीस सुरू करण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मुंबईतील एकाच वेळी उड्डाणपुलांची अनेक कामे सुरू आहेत. त्यापैकी अंधेरीचा गोखले पूल, विक्रोळीचा पूल नुकतेच सुरू झाले आहेत. तर कर्नाक पुलही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. आता पालिका प्रशासनाने शीव उड्डाणपूल आणि बेलासिस उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळांना सोमवारी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. तसेच मंगळवारी महापालिका मुख्यालयात बैठक घेऊन संबंधितांना निर्देश दिले. १५ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस आणि ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशी ठोस कालमर्यादा देखील बांगर यांनी निश्चित केली आहे.

पोलीस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे यांच्यासह मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित मेहला, सहायक अभियंता (निर्माण) व्ही. व्ही सतिशन यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यावेळी म्हणाले की, बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पूल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटविण्यासाठी पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे. ही बांधकामे हटविण्यासंदर्भातील कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत सुरू आहे. पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची सीमाभिंत बाधित होत असून ती मोकळी जागा रस्त्यासाठी आवश्यक आहे. ती जागा उपलब्ध उपलब्ध करून देण्याची कार्यवाही विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. रेल्वेच्या तुळया येण्यासाठी नियोजनापेक्षा काही प्रमाणात विलंब झाला आहे. सद्स्थितीत लोखंडी तुळया प्रकल्पस्थळी आल्या आहेत. दोन्ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे अभिजीत बांगर यांनी नमूद केले.