मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने आज, सोमवारी सरन्यायाधीश उदय लळित यांच्याकडे करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्दय़ांना आव्हान देणाऱ्या पाच याचिका सुभाष देसाई, सुनील प्रभू, मुख्यमंत्री शिंदे, भरत गोगावले यांनी सादर केल्या आहेत. त्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे वर्ग करण्याचा आदेश सरन्यायाधीशपदावरून नुकतेच निृवृत्त झालेले एन. व्ही. रमणा यांनी दिला होता़ या याचिकांवर गुरुवारी घटनापीठापुढे सुनावणी होईल, असेही त्यांनी नमूद केले होते.
मात्र, अद्याप घटनापीठाची स्थापना होऊन सुनावणीची तारीख न दिल्याने लवकरात लवकर घटनापीठ स्थापन करावे आणि याचिकांवर सुनावणी व्हावी, अशी विनंती शिवसेनेच्या वकिलांकडून नवे सरन्यायाधीश लळित यांना करण्यात येणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.