मुंबई : मुंबई महापालिकेची कामकाजाची भाषा मराठी असली तरी गेल्या काही वर्षांत प्रशासनाला मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषाच अधिक जवळची वाटू लागली आहे. मुंबई महापालिकेची परिपत्रके, नोटीसा या बहुतांशी इंग्रजी भाषेतच असतात. पावसाळापूर्व खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सोसायट्यांनी इंग्रजी भाषेतून नोटीसा दिल्याबद्दल शिवसेनेने (शिंदे) आक्षेप घेतला आहे. इंग्रजी भाषेतून नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे) केली आहे.

मुंबई महापालिकेचे कामकाज मराठी भाषेतून चालते हे खरे असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेमध्ये प्रत्यक्षात परिपत्रके, अहवाल, नोटीसा इंग्रजी भाषेतूनच काढल्या जात आहेत. मुंबईत अमराठींची संख्या वाढू लागल्यामुळे इंग्रजी भाषेचा वापर वाढू लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर डासांची पैदास होऊ नये म्हणून रहिवाशांनी कोणती काळजी घ्यावी यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने सोसायट्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यात खबरदारीच्या उपाययोनजांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. डी विभाग कार्यालयानेही गिरगाव, ग्रॅंटरोड परिसरातील रहिवाशांना, गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. मात्र या नोटीसा इंग्रजी भाषेत आहेत. पावसाळा जवळ आल्यावर नागरिकांनी काय काळजी घ्यावी, काय करावे, काय करू नये, डेंग्यू, हिवताप इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती उपाययोजना कराव्या याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रशासनाने काढलेले पत्रक इंग्रजी भाषेत आहे. शिवसेनेचे (शिंदे) विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून तक्रार केली आहे.

मराठी भाषा ही आमची राजभाषा आहे. महापालिकेचा कारभार मराठी भाषेतच झाला पाहिजे. मुंबई महापालिकेने हे पत्रक सामान्य मुंबईकरांसाठी काढले आहे. मुंबईमधील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठी भाषेचा वापर करण्याचा प्रशासनाला विसर पडला हे खेदजनक आहे. सर्व सामान्यांची भाषा ही मराठी आहे. मुंबईमधील नागरिकांसाठी कोणतेही पत्रक मराठी भाषेतच असले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी इंग्रजी भाषेत पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याचा आनंद सर्व स्तरावर व्यक्त होत असताना महापालिकेच्या कारभारात मात्र मराठी भाषेला पद्धतशीरपणे डावलण्याचे काम होत असेल तर ते धक्कादायक आहे. मराठी भाषेला डावलण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरेंच्या मराठीच्या मुद्यावर शिवसेना (शिंदे) आक्रमक

मराठी माणूस आणि मराठी भाषा यांना प्रतिष्ठा मिळावी या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. मराठी भाषा टिकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली १९९५ मध्ये शिवसेना – भाजप युतीचे सरकार अस्तित्त्वात आले. तेव्हा बॉम्बेचे नामकरण मुंबई असे करण्यात आले. तसेच मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठी भाषेतच झाला पाहिजे असे निर्देश देण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातही प्रशासनाचा कारभार मराठी भाषेतच झाला पाहिजे असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेला या ठरावाचा विसर पडला आहे. या मुद्द्याविरोधात आता कोणी राजकीय पक्ष आंदोलनही करीत नाही. मात्र शिवसेनेने (शिंदे) मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असून मराठीचा मुद्दा शिवसेनेला (शिंदे) किती लावून धरता येतो याबाबत उत्सुकता आहे.