मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दादरच्या शिवाजी पार्क मैदानाची मातीसंदर्भातील पाहणी केल्यानंतरही या मैदानातील मातीचा प्रश्न काही सुटणार नसल्याचीच चिन्हे दिसत आहेत. या प्रश्नी मुंबई आयआयटीने आपला अहवाल मुंबई महापालिकेकडे दिला असून माती न काढण्याची शिफारस केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने तेच उत्तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहे. सध्यातरी पाणी फवारणे, रोलर फिरवणे या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे तब्बल दहा वर्षांनी शिवाजी पार्क येथील मातीचा धुरळा खाली बसण्याची चिन्हे नाहीत.

शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षात सोडवता आलेला नाही. दरवर्षी हिवाळा आला की या मैदानातील माती हवेत उडू लागते व त्याचा तेथील रहिवाशांना त्रास होतो. मैदानातील माती काढण्याची रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ६ जानेवारीला अधिकाऱ्यांसह शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली होती. शिवाजी पार्क मैदानावर उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या परिसराला होणाऱ्या त्रासाची पाहणी कदम यांनी केली होती. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रश्नाबाबत पंधरा दिवसांत महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन कार्यवाहीला सुरुवात करावी असे आदेशही कदम यांनी महानगरपालिकेला दिले होते. ही मुदत २१ जानेवारीला संपत असून पालिका प्रशासनाने एमपीसीबीला उत्तर पाठवले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत दोनदा मुंबई महापालिका प्रशासनाला मातीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने या प्रश्नावर आयआयटी मुंबईचे मत घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार आयआयटीने या मैदानाची पाहणी करून नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. त्यात आयआयटीने माती न काढण्याची शिफारस केली आहे. तसेच धूळ उडू नये म्हणून मातीवर रोलर फिरवणे, पाणी फवारणे या उपाययोजना करण्यास सांगितल्या आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने एमपीसीबीला लिहिलेल्या उत्तरात आयआयटीच्या शिफारशींचा दाखला देत या विषयाला बगल दिली आहे.

हेही वाचा – Aditya Thackeray आदित्य ठाकरेंची बोचरी टीका,”सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर घटनाबाह्य माजी मुख्यमंत्र्यांच्या…”

काळे झेंडे लावून निषेध करणार

शिवाजी पार्कच्या मैदानात माती आणून टाकताना पालिकेने आयआयटीला विचारले होते का ? मैदानात सध्या असलेली माती ही मैदानातील नैसर्गिक माती नसून ती बाहेरून आणून टाकलेली आहे. त्यावर पाणी मारले तरी ते तासाभरात सुकते व पुन्हा माती उडते ही माहिती आयआयटीला दिली होती का असे प्रश्न रहिवासी प्रकाश बेलवडे यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – राणीच्या बागेत पुष्पोत्सव बहरणार; मुंबईकरांना हजारो फुलझाडे, वनस्पती पाहण्याची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी पार्कच्या मातीच्या प्रश्नी आता एमपीसीबी काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष आहे. प्रजासत्ताक दिनी रहिवाशांना आम्ही काळे झेंडे लावून निषेध करण्याचे आवाहन केले आहे. पाणी मारणे हे काही कायमस्वरुपी उत्तर होऊ शकत नाही. मातीच्या विषयावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही लढा देत राहू, असे बेलवडे यांनी सांगितले.