मनुष्यबळाअभावी नियोजित फेऱ्या रद्द; बस नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल

मुंबई : प्रवाशांच्या तुलनेत बेस्टच्या मर्यादित फे ऱ्या, त्यात प्रवासी क्षमतेची अट आणि इतर वाहतुकीच्या पर्यायांची वानवा यामुळे शिथिलीकरणाच्या पहिल्या दिवशी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे बेस्टला आपल्या नियोजित फे ऱ्याही गर्दीच्या वेळी चालविता न आल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली.

बेस्टने एरवीच्या नियमित ३,५०० पैकी २,५१४ फे ऱ्या चालविण्याचे नियोजन सोमवारी के ले होते. सकाळी आठ वाजता २५१४ पैकी १,७७८ बसगाडय़ा धावल्या. सकाळी दहा वाजता हीच संख्या २ हजार १३२ झाली. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गर्दीच्या वेळेत नियोजित बसगाडय़ा धावूच शकल्या नाहीत. वाढलेल्या प्रवासी संख्येपुढे या फे ऱ्या अपुऱ्या पडल्या. त्यात प्रत्येक आसनावर एक प्रवासी आणि उभ्याने पाच प्रवाशांची अट असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्यांची प्रचंड गैरसोय झाली. काही ठिकाणी तर प्रवाशांच्या सहनशीलतेचा इतका कडेलोट झाला की सामाजिक अंतराचे नियमही धाब्यावर बसविले गेले.

ठाण्यापासून मुंबईपर्यंतच्या प्रत्येक बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणाऱ्यांची तोबा गर्दी होती. हीच परिस्थिती दहिसर ते वांद्रे, दादर, लोअर परळदरम्यान होती. बस भरून येत असल्याने मधल्या मार्गावरील प्रवाशांना प्रवेश करता येत नव्हता. जबरदस्ती प्रवेश करणाऱ्यांना वाहकाकडून नकारच दिला जात होता.  काही ठिकाणी मात्र वाट पाहून कं टाळलेले प्रवासी धक्काबुक्की करून प्रवेश करत होते. काही थांब्यांवर वाहकांनी हतबल होऊन प्रवाशांना प्रवेश दिला. परिणामी उभ्याने पाच प्रवाशांची मर्यादा असूनही आठ ते दहा प्रवासी उभे राहून प्रवास करीत होते. तर एका आसनावर दोन-दोन प्रवासीही बसत होते.

मी डोंबिवलीला राहतो आणि चेंबूरला पोस्ट कार्यालयात काम करतो. मुंबईला येण्यासाठी काहीच वाहतुकीचे साधन नसल्याने खासगी गाडीने मुलुंड म्हाडा कॉलनी बस थांब्यापर्यंत आलो. बस मिळवण्यासाठी दीड तास गेला. अनेक निर्बंधांमुळे बसवाहक बस थांबवत नाहीत.                           – व्ही.एस.माळी, प्रवासी

मी ठाण्यात राहतो. दादरला पालिके च्या जी. उत्तर कार्यालयात काम करतो. मात्र पाऊण तास झाला तरीही बस मिळू शकलेली नाही. आधीच भरून येणाऱ्या बस थांबत नाहीत.      – डी.जी.वझे, प्रवासी