मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या १,६३२ नव्या रुग्णांचे निदान झाले तर ४० जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपैकी निम्म्यांपेक्षा जास्त रुग्ण हे मुंबई, पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांतच आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. दिवसभरात नगर जिल्हा १६२, पुणे जिल्हा २०६, पुणे शहर १०३ तर पिंपरी-चिंचवडमध्ये ७२ रुग्णांची नोंद झाली. या तीन जिल्ह्यांचा अपवाद वगळल्यास राज्याच्या अन्य भागांत रुग्णसंख्या घटली आहे. मराठवाड्यात ८४ तर विदर्भात फक्त २० नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या २४ हजार १३८ रुग्ण हे उपचाराधीन आहेत. यात सर्वाधिक ६९५५ हे पुणे जिल्ह्यातील आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ लाख ९९ हजार जणांना करोनाची लागण झाली असून, १ लाख ३९ हजार जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आणखी ४२१ रुग्ण, पाच जणांचा मृत्यू मुंबईत शुक्रवारी करोनाचे ४२१ नवे रुग्ण सापडले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत करोनाबाधितांची संख्या ७ लाख ५२ हजार ८०७ पर्यंत आणि मृत रुग्णांची संख्या १६ हजार २०२ पर्यंत पोहोचली आहे. मुंबईत करोना चाचण्यांत वाढ करण्यात आली असून शुक्र वारी ३८ हजार २४२ चाचण्या करण्यात आल्या. करोनामुक्तांची टक्केवारी ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १,३७५ दिवसांपर्यंत पोहोचला आहे. ठाणे जिल्ह्यात १७० बाधित ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १७० रुग्ण आढळून आले. तर, तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली ४८, ठाणे ४१, नवी मुंबई ३८, मीरा भाईंदर २०, बदलापूर आठ, उल्हासनगर पाच, ठाणे ग्रामीण चार, अंबरनाथ तीन आणि भिवंडीतील तिघांचा समावेश आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली नवी मुंबईतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.