मुंबई : महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असून आवश्यकतेनुसार मोठय़ा भावालाच त्याग करावा लागतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी भाजपच्या ध्येयधोरणात तसूभरही बदल होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप पदाधिकारी व नेत्यांची दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी फडणवीस म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्याचा आपला संकल्प असून तो केवळ भाजपसाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाचा आहे. देशासाठी त्याग करण्याची आपल्या कार्यकर्त्यांची तयारी असून लोकशाही मार्गाने देशाला परमोच्च शिखरावर नेण्यासाठी आपण लढाई दिली पाहिजे.

हेही वाचा >>>२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला :जखमींविषयीच्या प्रश्नांवर प्रज्ञासिंह ठाकूर भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत देश बदलला असून त्यांच्या नेतृत्वाचे जगभरात कौतुक झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होत असून अनेक देश भारताच्या बाजूने उभे आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले.राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीशी आपली लढाईच नाही. मोदी यांचा विरोध करण्यासाठी ते एकत्र आले असून त्यांच्यातही अनेक वाद आहेत. त्यांच्यात एकही राष्ट्रीय नेता नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.