मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात असलेले पालिकेचे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय गेल्या पाच वर्षांपासून पुनर्विकासाच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे. परिणामी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने पालिकेने तात्काळ रुग्णालयाचे काम सुरू करावे अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यासाठी सोमवारपासून विक्रोळीतील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यानी साखळी उपोषण सुरू केले आहे.   

हेही वाचा <<<वरळीत ९५ हजार रुपये प्रति चौरस फूट अशा विक्रमी दराने घराची विक्री; १५१ कोटीत दोन सदनिकांची खरेदी

हेही वाचा <<<वातानुकूलित लोकलबाबत स्टेशन मास्तर प्रवाशांशी संवाद साधणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या कन्नमवार नगर परिसरात महात्मा ज्योतिबा  फुले रुग्णालय हे पालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. मात्र पालिकेने वेळोवेळी योग्य डागडुजी न केल्याने रुग्णालयाची इमारत धोकादायक बनली आहे. जुनी इमारत पाडून नवीन सुसज्ज इमारत बांधण्यासाठी रुग्णालयातील अनेक विभाग २०१७ पासून बंद करण्यात आले आहेत. परिणामी रुग्णांना उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी अथवा शीव रुग्णालयात जावे लागते. पूर्व द्रुतगती मार्गापासून हे रुग्णालय काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने अनेकदा पूर्व द्रुतगती मार्गावर अपघात झाल्यानंतर याच रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात येत होते. मात्र रुग्णालय बंद असल्याने अपघातग्रस्तांना राजावाडी अथवा शीव रुग्णालयात पाठवावे लागते. त्यामुळे पालिकेने तात्काळ हे रुग्णालय सुरू करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. त्यासाठी अनेक वर्षांपासून येथील नागरिक पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र पालिका अधिकारी नागरिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सोमवारपासून विक्रोळीतील विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन रुग्णालयाबाहेर साखळी उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत मुख्यमंत्री स्वतः लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती यावेळी उपोषणकर्त्यांनी दिली.