मुंबई: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ दिल्यानंतरही जवळपास २८ तास विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन बंद ठेवण्यात आला होता. इन-हाउस कोट्याच्या नियमांत केलेले बदल अद्ययावत करण्यासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देत अर्जाचा भाग दोन बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला होता. मात्र त्याबाबत ऐनवेळी संकेतस्थळावर माहिती देण्यात आल्याने पालक, विद्यार्थी हवालदिल झाले.

अकरावी प्रवेश प्रक्रिया पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिक्षण विभागाने इन हाऊस कोट्याच्या नियमात केलेल्या सुधारणेमुळे महाविद्यालयांतील जागा दाखविण्यासाठी संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यानुसार हा बदल करण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून अकरावी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली होती. मात्र मुदतवाढ जाहीर केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला. मात्र ३ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ४ जून दुपारी २ वाजेपर्यंत अर्जाचा भाग दाेन बंद ठेवण्यात येत असल्याचा संदेश संकेतस्थळावर संदेश प्रसारित करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी अर्जाची नोंदणी करता येत असली तरी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व पालक हताश झाले. दरम्यान ४ जून रोजीही दुपारी २ नंतर अर्ज भरता येत नसल्याने अनेक पालक व विद्यार्थ्यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली. दुपारी जवळपास साडेतीननंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येऊ लागला. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी दिलेल्या वाढीव मुदतीतील तब्बल २८ तास विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरताच न आल्याने ते वाया गेल्याची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत होती.

अन्य मंडळाच्या विद्यार्थी त्रस्त

राज्यमंडळ वगळता अन्य मंडळांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांची मर्यादा कमी आहे. त्यामुळे अर्ज भरताना ३० पेक्षा कमी गुण असलेल्या अन्य मंडळातील विद्यार्थ्यांचा अर्जच स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे या मंडळाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती.

मुंबई, पुण्यातून सर्वाधिक अर्ज

इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आतापर्यंत १२ लाख १३ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज नोंदणी मुंबईतून १ लाख १९ हजार ५९२ इतकी झाली आहे. त्याखालोखाल पुण्यातून १ लाख १४ हजार ९५३, ठाणे ९६ हजार ७१९, नाशिक ६० हजार ७६७, अहिल्यानगर ४९ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचा तपशील

एकूण विद्यार्थी नोंदणी – १२१३४५७

शुल्कासह नोंदणी – ११३४४३३

अर्ज अंतिम करुन लॉक केला – ११२०३७२

नियमित फेरीसाठी अर्ज – १००७३६६

इनहाऊस कोट्यासाठी अर्ज – ५३१६६

व्यवस्थापन कोट्यासाठी अर्ज – २६५८६

अल्पसंख्यांक कोट्यासाठी अर्ज – ४१०४१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन हाऊस कोट्यातील बदल करताना अर्जचा भाग दोन सुरू ठेवला असता तर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असता. त्यांना योग्य माहिती उपलब्ध झाली नसती. विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून अर्जाचा भाग दोन बंद ठेवण्यात आला होता. हा बदल करण्यासाठीच मुदतवाढ दिली होती. आता मुदत वाढ दिल्यास अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होईल, त्यामुळे अर्ज भरण्यासाठी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. डॉ. श्रीराम पानझडे. प्रभारी संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय.