मुंबई : राज्यातील उसाचे वाढते पीक लक्षात घेऊन यंदाचा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी सहकार विभागाने सुरू केली असतानाच शेतकऱ्यांचे मागील हंगामातील ‘एफआरपी’चे ६३९ कोटी रुपये साखर कारखान्यांनी थकविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी या कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एकूण ४३ हजार ३१० कोटी रुपयांची एफआरपी मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी ४२ हजार ६७१ कोटी रुपयांची एफआरपी आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली आहे. मात्र अजूनही ८१ कारखान्यांनी ६३९ कोटी रुपये थकविले आहेत, तर ११९ कारखान्यांनी शेतकऱ्यांची देय ‘एफआरपी’ संपूर्णपणे दिली आहे.

हेही वाचा >>> मतदारांमध्ये सत्तेची मस्ती उतरवण्याची ताकद – अजित पवार

गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या लागवडीत दोन लाख हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा १४.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक आले असून यंदाच्या हंगामात १३८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची अपेक्षा आहे. गाळप वेळेवर होण्यासाठी यंदाचा हंगाम लवकर म्हणजेच १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत आज, सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिगटाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.

कारवाई काय?

ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही त्यांच्यावर जमीन महसुलाची थकबाकी समजून कारवाई सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार सात कारखान्यांविरोधात ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोठे थकबाकीदार कोण?

* भोरचा राजगड सहकारी साखर कारखाना

* साताऱ्यातील किसनवीर सहकारी साखर कारखाना

* उस्मानाबादचा जयलक्ष्मी साखर कारखाना

* अहमदनगरचा साईकृपा कारखाना