मुंबई: बेस्टच्या विजग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून विजेची छापील बिले मिळत नसल्याची तक्रार येऊ लागली आहे. छापील बिले मिळत नसल्यामुळे बिल भरायचे लक्षात राहत नाही व त्यामुळे दंड भरावा लागत असल्याची तक्रार ग्राहक करू लागले आहेत. तर दुसरीकडे छापील बिलांचे वितरणच होत नसल्यामुळे बिलांचे गठ्ठे बेस्टच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात पडून राहत आहेत.

बेस्ट उपक्रमाचा आर्थिक डोलारा आजवर ज्या विद्युत विभागाच्या जीवावर उभा आहे त्या विद्युत विभागातील बिलांच्या वितरणाचा ढीसाळपणामुळे ग्राहकांना भुर्दंड बसू लागला आहे. चार वर्षांपूर्वी बेस्टने विजेची बिले ऑनलाईन पद्धतीने देण्याची पद्धत सुरू केली. मात्र बेस्टच्या ग्राहकांना अजूनही छापील बिलाची सवय सुटलेली नाही. बेस्टने कागदविरहित कारभार करण्याचा निश्चय केल्यामुळे ग्राहकांना कागदी बिले देण्याऐवजी ऑनलाईन बिले दिली जात आहेत. परंतु, अनेक ग्राहकांना छापील बिलांवर अवलंबून राहण्याचीच सवय आहे. परंतु, वीज बिलांचे वितरण करण्याची बेस्टची यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे विजेची बिले अंतिम तारखेच्यानंतर ग्राहकांच्या हातात पडत आहेत. तर अनेक विभागात तर ही बिले मिळतच नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढील महिन्याच्या बिलात २० ते ५० रुपये जादा भरावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. डोंगरी परिसरात तर गेल्या दोन महिन्यात विजेचे बिल मिळालेच नसल्याची तक्रार माजीद खान यांनी केली आहे. तसेच त्यांनी बेस्ट प्रशासनालाही याबाबत पत्र लिहून विजेचे छापील बिल मिळावे अशी मागणी केली आहे.

हेही वाचा… चेंबूरमध्ये सुरू होणार रक्तशुद्धीकरण केंद्र

बेस्टच्या वीजेच्या बिलांच्या वितरणासाठी बेस्टकडे असलेला कर्मचारी वर्ग अपुरा पडू लागला आहे. साडे तीनशेपेक्षा जास्त बिले वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक बिलामागे दोन रुपये दिले जात होते. मात्र गेल्याकाही वर्षांपासून बिलांच्या वितरणासाठी बेस्टने डाक विभागाकडे हे काम दिले आहे. परंतु, पत्ता न सापडल्यामुळे किंवा ग्राहकांचा पत्ता बदललेला असल्यामुळे ही बिले परत येत असल्याचे वितरण विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बिलांचे गठ्ठे वितरण विभागात पडून राहत असल्याचेही कर्मचारी सांगतात. बिल भरण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर बिले वितरणासाठी पाठवली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना ही बिले आधीच उशीरा मिळत आहेत. नियमित वेळेवर बिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र त्यामुळे विनाकारण जादा पैसे भरावे लागत आहेत.

बेस्टने कागदविरहित कारभार केलेला असला तरी बिले छापण्याचे बंद केलेले नाही. मात्र ही बिले वितरित केली जात नसल्यामुळे बेस्टच्या सर्व विभागांमध्ये बिलांचे गठ्ठे पडून आहेत. छापील बिल मिळवण्यासाठी ग्राहक विद्युत विभागाच्या कार्यालयात येऊन बिल छापून घेत असल्याचेही येथील कर्मचारी सांगतात.

हेही वाचा… २२ वर्षांच्या सेवेत १७ वर्षे प्रतिनियुक्तीवर! …तरीही ‘झोपु’; अभियंत्याला मुदतवाढ!

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने विजेचे बिल भरण्यासाठी बेस्टने अनेक पर्याय दिले आहेत. बिल हे ईमेल द्वारे दिले जाते, मोबाईलवर संदेश दिला जातो, तसेच बेस्टच्या ॲपवरूनही बिल पाहता येते व भरता येते. ऑनलाईन पद्धतीने बिल भरणाऱ्यांना प्रत्येक बिलात १० रुपये सूट दिली जाते, अशी प्रतिक्रिया बेस्टच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. अनेक ग्राहक विजेचे बिल हे आपल्या घराच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून त्याकडे पाहत असल्यामुळे छापील बिल मिळावे अशीच त्यांची आजही अपेक्षा आहे. मात्र विजेचे बिल हा पुरावा ठरू शकत नाही. मात्र तरीही छापील बिलाचा ग्राहकांचा हट्ट असतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

१.२५ टक्के जादाचा भुर्दंड

विजेचे बिल तयार केल्यापासून तीन आठवड्याच्या आत बिल भरावे लागते. अंतिम दिनांकाच्या आत भरले नाही तर एकू ण बिलावर १.२५ टक्के जादा आकारणी के ली जाते. २० ते ५० रुपयांनी बिल वाढते. त्यामुळे ग्राहकांची चूक नसताना ही रक्कम ग्राहकांना भरावी लागते आहे. अनेक ग्राहक न बघताच ही रक्कम भरतात. मुंबईतील विद्युत पुरवठ्याच्या या जाळ्याचे १८ विभाग के लेले आहेत. त्या प्रत्येक विभागाचे मीटर वाचन करण्याचे व बिल वितरण करण्याचे वेळापत्रक ठरलेले असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीटर वाचक ——————-१४०
बिल वितरण करणारे ———–१२५
मीटरची संख्या ——–१० लाख २० हजार