लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई हे आर्थिक केंद्र असून, मुंबईतून ये-जा करण्याचा प्रवास कालावधी कमी वेळेत, आरामदायी प्रवास होण्यासाठी राज्यासह देशातील महत्त्वाच्या स्थळांना वंदे भारतने मुंबईला जोडले जात आहे. आतापर्यंत मुंबईतून गांधीनगर, शिर्डी, सोलापूर आणि मडगाव येथे गाड्या धावत आहेत. आता वंदे भारत एक्स्प्रेस उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालन्यापर्यंत पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला शनिवारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना हा मतदारसंघ असून जालना-मुंबई हा मार्ग वंदे भारतने जोडण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार विविध पायाभूत कामे पूर्ण करून जालना-सीएसएमटी वंदे भारत सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. तसेच अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून २ अमृत भारत एक्स्प्रेस व ६ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यात दरभंगा ते अयोध्या-दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) मालदा टाउन ते बेंगळुरू छावणी या दोन मार्गावर अमृत भारत एक्स्प्रेस धावेल. तर श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली, अमृतसर – दिल्ली जंक्शन, कोईम्बतूर – बेंगळुर, मंगळुरु – मडगाव (गोवा), अयोध्या धाम जंक्शन – आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) आणि जालना – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या सहा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.

आणखी वाचा-मुंबई : १५ कोटींच्या कोकेनसह परदेशी महिलेला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी ०२७०५ क्रमांकाची जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस तात्पुरत्या वेळापत्रकानुसार एकमार्गी धावणार आहे. ही गाडी आठ डब्यांची असेल. जालन्यावरून सकाळी ११:०० वाजता रेल्वेगाडी सुटेल, तर, सीएसएमटी येथे सायंकाळी ६.४५ वाजता पोहचेल. जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर आणि सीएसएमटी या सर्व स्थानकांवर थांबा असेल.