मुंबई : राज्यात आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, या कालावधीत संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवेच्या दाबात घट आणि नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आठवडाभर राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. यामुळे यवतमाळ, बुलढाणा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी १६ कि.मी. तर अकोला जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी २२ कि.मी. राहील. उत्तर महाराष्ट्र, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात आणि कोकणात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.
या कालावधीत वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने कमाल व किमान तापमानात घट होईल. पूर्व मोसमी पावसाच्या शक्यतेमुळे वाऱ्याची दिशा नैकृत्येकडून असेल. हिंदी महासागरात १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे बाष्पयुक्त वारे वेगाने वाहण्यास सुरुवात होईल. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याच्या वेगात बदल जाणवतील. दरम्यान, सोमवारपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे.
गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज
जळगाव, नाशिक, अहिल्या नगर,पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली , सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ
हलक्या पावसाचा अंदाज
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर
अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
अकोला येथे रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ४१.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर येथे ४०.४ अंश सेल्सिअस, जळगाव ४० अंश सेल्सिअस, वर्धा ४० अंश सेल्सिअस आणि सोलापूर येथे ३९.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.