चक्रधर स्वामींच्या नावे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत दिले. बच्चू कडू (अपक्ष) यांनी या विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी केली होती. पुढील २५ वर्षे मराठी भाषेचे धोरण कसे असावे हे ठरविण्याकरिता डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
३० लाख खटले प्रलंबित
राज्यातील न्यायालयांमध्ये डिसेंबर अखेर ३० लाख खटले प्रलंबित असल्याची माहिती विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली. खटले लवकर निकालात निघावे म्हणून न्यायालये दोन पाळ्यांमध्ये चालविण्यात येत आहेत. राज्यात सरकारी वकिलांची नेमणूक केली जात नाही तसेच सेवेत असलेल्या वकिलांना मानधन दिले जात नाही, असा मुद्दा सुनील केदार (काँग्रेस) यांनी मांडला.