मुंबई : मुंबईत मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्याचा तिसऱ्या टप्प्यातील माफीचा साक्षीदार आणि त्याच्या नातेवाईकांना चोवीस तास सुरक्षा देण्याचे आदेश विशेष न्यायासयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी बारा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक जखमी झाले होते. एकूण १२३ जणांवर या प्रकरणी खटला चालवण्यात आला होता. त्यात बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याचा भाऊ याकूब याच्यासह १०० जणांना विशेषे टाडा न्यायालयाने दोषी ठरवले होते. याकूब याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली. या प्रकरणी अभिनेता संजय दत्त याला बेकायदा शसत्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झाली होती. त्याची नंतर चांगल्या वर्तणुकीमुळे मुदतपूर्व सुटका करण्यात आली.
या खटल्यातील अनेक आरोपी फरारी होते. त्यांना नंतर अटक करण्यात आले आणि त्यांच्यावर स्वतंत्रपणे खटला चालवण्यात आला. खटल्याच्या तिसऱ्या टप्प्याची सुनावणी सध्या सुरू आहे. खटल्यातील प्रमुख साक्षीदाराने आधीच कडेकोट सुरक्षेत दोनदा न्यायालयात साक्ष दिली होती आणि खटल्याच्या तिसऱ्या टप्प्यात त्याला चोवीस तास पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे, असे सांगून या साक्षीदाराने त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
मुंबई पोलिसांच्या संरक्षण शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी खटल्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात माफीचा साक्षीदार झालेल्या या साक्षीदाराला ३२ रक्षकांचे संरक्षण आणि बुलेटप्रूफ कार उपलब्ध केली होती. आता खटल्याच्या तिसऱ्या टप्प्यात त्याला पुन्हा साक्षीसाठी पाचारण करण्यात आले आहे. परंतु, त्याला एक सुरक्षारक्षकाशिवाय कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सुरक्षा पुरेशी नसल्याचा दावा करून या साक्षीदाराने पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. आपल्यासह आपल्या कुटुंबीयांनाही धोका आहे. परंतु वारंवार विनंती करूनही संरक्षण विभागाने त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा उपलब्ध केलेली नाही. विशेष न्यायालयाने या साक्षीदाराची मागणी मान्य करून त्याला आणि त्याच्या कुटुंबासाठी चोवीस तास पुरेशी सुरक्षा उपलब्ध करण्याचे आदेश पोलिसांना दिले.