मुंबई : अनेक वर्षांपासून देवनार कचराभूमीत साचलेले कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदा भरण्याची मुदत संपली असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या तीन कंपन्यांपैकी केवळ एकाच कंपनीला कचरा विल्हेवाटीच्या क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे. अन्य दोन कंपन्या पायाभूत प्रकल्प क्षेत्रातील आहेत. या दोन कंपन्यांनी यापूर्वी अदानी कंपनीसोबत संयुक्त भागिदारीत पायाभूत प्रकल्पासाठी काम केले आहे.

देवनार कचराभूमीतील कचऱ्याचे डोंगर साफ करून रिकामी होणारी जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले आहेत. देवनार कचराभूमीतील कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने मे महिन्यात निविदा मागवल्या होत्या. निविदा भरण्यापूर्वीची पूर्वबोली बैठक मे महिन्याच्या अखेरीस पालिका मुख्यालयात पार पडली होती. या बैठकीला २१ विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, प्रत्यक्षात शेवटच्या दिवसापर्यंत यापैकी केवळ ३ निविदाकारांनी निविदा भरल्या. पालिका प्रशासनाने मंगळवारी निविदा उघडल्या. या तीन कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी करून ११ जुलै रोजी कंपन्यांचे वित्तीय देकार उघडण्यात येतील व त्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

कोणत्या तीन कंपन्या

नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लि. आणि आरई सस्टेनेबिलिटी आणि एच. जी. इन्फ्रा इंजिनीअरींग लि. या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. त्यापैकी आरई सस्टेनेबिलिटी ही कंपनी आधीच देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारत आहे. तर अन्य दोन कंपन्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील आहेत. नवयुग कंपनीने अदानी कंपनीसोबत संयुक्त भागिदारीत विजयवाडा बायपास प्रकल्प राबवला आहे. तर एच. जी. इन्फ्रा कंपनीनेही अदानी कंपनीसोबत संयुक्त भागिदारीत उत्तर प्रदेशातील गंगा एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी काम केले आहे.

१८५ लाख मेट्रीक टन कचरा

देवनार कचराभूमीत एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवण्यासाठी सुमारे २३६८ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आला आहे. मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून जुना कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली असून महसूल व वन विभागाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही जमीन रिकामी करण्याची विनंती फेब्रुवारी महिन्यात केली होती.

असा असेल कामाचा व्याप

एकूण जुन्या कचऱ्याचे अंदाजित वजन – १८५ लाख मेट्रीक टन

एकूण व्याप्त जागा – ११० हेक्टर

कचरा हटवण्यासाठी एकूण अंदाजित खर्च – २,३६८ कोटी रुपये

कंत्राट कालावधी – तीन वर्षे (पावसाळ्यासहित)

दरदिवशी कचऱ्याची विल्हेवाट – २३ हजार मेट्रीक टन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर दिवशी वाहनांची ये – जा – प्रतिदिन १२०० फेऱ्या